राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली पोलिस भरतीची प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव तूर्त स्थगित करण्यात आली आहे. नियोजत वेळापत्रकानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हानिहाय भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत होती. आता ती प्रक्रिया थांबविण्यात आली असून जाहिरात केव्हा प्रकाशित करायची, याची तारीख नंतर कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्याचे पोलिस महासंचालक (प्रशिक्षणे व विशेष पथके) संजय कुमार यांनी २९ ऑक्टोबर रोजी यासंबंधीचा आदेश सर्व जिल्हा पोलिस दलाच्या प्रमुखांना पाठविला आहे. प्रशासकीय कारणास्तव जाहिरात देण्याची कार्यवाही तूर्त स्थगित करण्यात आली आहे. ही जाहिरात प्रसिदध करण्यासंबंधीची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार सुमारे १४ हजार ९५६ पदांसाठीची भरती प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार होती. यासाठी जिल्हानियहा पदसंख्या, आरक्षण वगैरे गोष्टी निश्चित करण्यात आल्या होत्या. त्याची माहितीही जाहीर झाली होती. आता यासंबंधी १ नोव्हेंबरपासून जाहिरात प्रसिदध करून जिल्हानिहाय भरतीची कार्यवाही सुरू करणे बाकी होती. असे असताना आज अचानक ही कार्यवाही स्थगित केल्याचा आदेश आला आहे. त्यामुळे बहुचर्चित पोलिस भरती लांबणीवर पडली आहे.