सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

बारामतीच्या पवारांना शहाणा बाप कसा म्हणायचं…! खा.रणजितसिंह निंबाळकरांनी साधला शरद पवारांवर निशाणा

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): पवार साहेब राजकारणातले जाणते नेते असतानाही त्यांनी या मातीत निवडून आल्यानंतर इथल्या योजना, पाणी, रस्ते, योजना, रोजगार बारामतीला गेला, म्हणून शरद पवारांच्या भूमिकेचा तिटकारा आला. पवारांशी ताकदीने वाद घालून, त्यांच्याशी लढून पाणी आणावं लागलं. नीरा देवधरच्या पाण्यासाठी आम्ही त्यांच्या कानात गेलो आणि हत्ती बसवला. ज्या वेळेस इस्टेटीची वाटणी होते त्यावेळी एकाच पोराला सगळी इस्टेट दिली तर त्याला शहाणा बाप कोण म्हणेल का. तसंच बारामतीच्या पवारांना शहाणा बाप कसा म्हणायचं अशा तीव्र शब्दात भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पवारांवर निशाणा साधला.

माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ बुधवार २४ एप्रिल सांगोला तालुक्यातील चिकमहुद, कटफळ, खवासपूर, लोटेवाडी, एखतपूर, अजनाळे, वाटंबरे, नाझरे, बलवडी, चोपडी या गावात खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा पार पडली.

यावेळी बोलताना भाजपचे उमेदवार खा. रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, २००९ साली देशाचे नेते शरद पवार माढा मतदारसंघात उभे राहतात म्हणून या तालुक्याचा विकास होणार मतदारसंघातील जनता हुरळून गेली होती. पाण्याचा प्रश्न पवार साहेब मिटवतील अशी शेतकऱ्यांना आशा होती. त्यावेळी सभेत पवारांनी मावळत्या सूर्याची शपथ घेवून सांगोला तालुक्याला दुष्काळमुक्त करतो, माढा लोकसभा मतदारसंघाची बारामती करेन, असा शब्द दिला होता. सूर्य देखील मावळला आणि पवार साहेब देखील मावळले पण सांगोल्याचा प्रश्न सुटला नाही. मात्र, लोकांच्या पदरी भोपळा मिळाला.

 

पवारांनी पाण्याचा प्रश्न सोडविण्याऐवजी माढा मतदारसंघाचे हक्काचे पाणी बारामतीला पळवून नेले. पवार साहेबांचा जेवढा अनुभव आहे, तेवढं माझं वय देखील नाही. पवार साहेबांनी पाण्याचा शब्द पाळला नाही पण मी शब्द पाळला आहे.

माळशिरस मधले जे नेते मते मागत आहेत त्यांनी तालुका तापवला, तिकडे फाटे फोडायचे आणि सांगोल्यावर वेगळ्या पद्धतीने राग काढून त्यांनी २० वर्षे पाणी येवू दिले नाही. विकास कामांसाठी पैसे देतील का, मोहिते पुन्हा नीरा उजवा कालवा चालू देतील का ? असा प्रश्न उपस्थित करून माणसं पाण्यावाचून मेली तरी मोहिते पाटील पाणी देणार नाहीत. मोहिते पाटील यांनी पतसंस्था, बँका, साखर कारखाने बुडवले, घोटाळे केले, तरी याचं पोट भरेना. पण यांची पिपाणी लोकं वाजवणार असल्याची टीका खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी केली.

आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, रामायण, महाभारत संपेल पण मोहिते पाटील आणि शहाजीबापूंचा इतिहास संपणार नाही. मोहिते पाटलांनी ५० वर्षे सांगोला तालुक्याचं नीरा उजवा कालव्याचं पाणी अडवलं. गेल्या पाच वर्षात टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा या सिंचन योजनेचे पाणी आले आहे. ऐन उन्हाळ्यात कोयना धरणातून पहिल्यांदा माण नदीत सोडले आहे. पवारांना, विजयदादांना निवडून दिलं, पण काय काम केले ते दिसले नाही. नीरा उजवा कालवा सिंचन योजनेतून एक टीएमसी पाणी वाढवून दिले आहे. ज्यांनी ५० वर्षे सांगोल्याला पाणी मिळू दिले नाही तेच मोहिते पाटील निवडणुकीत मते मागत आहेत. ५५ वर्षे भोगलेल्या दुष्काळाच्या झळा काळजात असतील तर या तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी विरोधकांच्या तुतारीची फुकारी केल्याशिवाय राहणार नाहीत अशी सडकून टीका आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली.

यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, राजश्री नागणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार, दुर्योधन हिप्परकर, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत चव्हाण, उत्तम खांडेकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद बाबर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!