म्हैसाळ योजनेच्या विस्तारत वंचित गावांचा समावेश करून तालुक्याचा दुष्काळी तालुका हा कलंक पुसून काढणार : आमदार शहाजीबापू पाटील
"आमदार आपल्या दारी" उपक्रमात पहिल्याच दिवशी आजी माजी आमदारांची ११ गावांना भेट ; रस्ते पाणी आणि आरोग्य विषयक प्रश्नावर "ऑन द स्पॉट फैसला"

सांगोला तालुक्यातील शेतीसाठी टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा, उजनी उपसा सिंचन योजना, जीहे काठापूर आदी योजनेतून पाणी मिळते. तालुक्यातील लाखो हेक्टर क्षेत्र या योजनाद्वारे ओलिताखाली येते परंतु, ज्या भागांना आजही कोणत्याच योजनेचे पाणी मिळत नाही त्या सर्व गावांचा म्हैसाळ सिंचन योजनेच्या विस्तारात समावेश करून सांगोला तालुक्याचा दुष्काळी तालुका हा कलंक पुसून काढणार असा निर्धार सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला.
“आमदार आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवार दि. २० रोजी आमदार शहाजीबापू पाटील मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील या आजी माजी आमदारांनी सांगोला तालुक्यातील नराळे, डिकसळ, पारे, हंगीरगे, घेरडी, वाणीचिंचाळे, वाकी घे, आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव आणि राजापूर गावातील हजारो शेतकऱ्यांशी भेटून त्यांच्याशी संपर्क साधला. विशेष म्हणजे सकाळी १० वाजता सुरू झालेला “आमदार आपल्या दारी” हा कार्यक्रम रात्री १० पर्यंत सुरू होता. या दौऱ्यात फॅबटेक उद्योग समूहाचे प्रमुख आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भाऊसाहेब रुपनर आदींसह तहसीलदार अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे महावितरणचे उप अभियंता आनंद पवार आदीसह सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दरम्यान या अभिनव उपक्रमात ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी आपले रस्ते पिण्याचे पाणी आरोग्य आणि समाज मंदिर यासह अनेक विषयांची मागणी आजी माजी आमदारांकडे केली. विशेष म्हणजे नागरिकांच्या मागणीनुसार आमदार शहाजीबापू पाटील यांनी जराही विलंब न करता “ऑन द स्पॉट फैसला” करून नागरिकांना दिलासा दिला. पहिल्याच दिवशी या उपक्रमास तालुक्यातील ११ गावातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावात फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांनी आजी माजी आमदारांचे स्वागत केले.
पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, १२ जानेवारी रोजी पुणे येथे झालेल्या सिंचन भवनमधील बैठकीत म्हैसाळ योजनेच्या विस्तारत सांगोला तालुक्यातील नराळे, डिकसळ, पारे, हंगीरगे, घेरडी, वाणी चिंचाळे, वाकी घे, आलेगाव आणि मेडशिंगी गावातील तब्बल ५ हजार एकरहून अधिक क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहे. या निर्णयाला सरकारने मंजुरी दिली आहे येत्या दोन ते तीन महिन्यात या कामास सुरुवात होईल. वंचित गावांत असणारे छोटे मोठे तलाव म्हैसाळ योजनेतून वर्षातून किमान दोनवेळा पूर्ण क्षमतेने भरून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. ग्रामीण भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न येत्या तीन ते चार महिन्यात मार्गी लावणार आपण मला सांगितलेले एकही काम येत्या निवडणुकी पर्यंत शिल्लक ठेवणार नाही असेही यावेळी आमदार शहाजीबापूंनी आवर्जून नमूद केले.
यावेळी बोलताना मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, सांगोला तालुक्याचे प्रलंबित विकासकामे मार्गी लावत असताना विकासाच्या कामात कसलेही राजकारण न करता संपूर्ण सांगोला तालुक्याचा सर्वसमावेशक विकास करण्याचे स्वप्न आमदार शहाजीबापू पाटील आणि मी पूर्ण करत आहोत. तालुक्यातील तळागाळात राहणारा सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून नराळेपासून इटकीपर्यंत आणि जुनोनीपासून देवळेपर्यंत तालुक्यातील एकही गाव विकासापासून वंचित ठेवणार नाही. नागरिकांनी आपल्या व्यथा आणि समस्या आपल्यापर्यंत पोहचवाव्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू तालुक्यातील नागरिकांचा अपेक्षाभंग होणार नाही याची प्रकर्षाने काळजी घेऊ आणि संपूर्ण राज्याला हेवा वाटावा असा सांगोला तालुक्याचा विकास बापूंच्या साथीने करून दाखवू असा विश्वासही या दौऱ्यात मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
१) बापू आणि आबा सांगोला तालुक्याच्या विकासरथाची दोन चाके
२०१९ रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपने शहाजीबापू आणि दिपकआबा एकत्र आले. सांगोला तालुक्याच्या विकासाची ही दोन चाके जेंव्हापासून एकत्र आली आहेत तेंव्हापासून सांगोला तालुक्याच्या विकासाची गाडी सुसाट वेगाने धावू लागली आहे. सांगोला तालुक्याच्या उत्कर्षासाठी आता या गाडीला कुठेही गतिरोधक नको आहे. दोन नेत्यांनी असेच एकदिलाने काम केल्यास आगामी काळात तालुक्याच्या विकासाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही अशी चर्चा प्रत्येक गावातील उपस्थित कार्यकर्त्यातून बोलले जात होते.
२) शहाजीबापूंनी आवर्जून जागवल्या जुन्या शिलेदारांच्या आठवणी…!!
“आमदार आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत शुक्रवार दि २० रोजी आमदार शहाजीबापू पाटील आणि मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी ११ गावांना भेट दिली. प्रत्येक गावात नागरिकांशी संवाद साधत असताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी १९९० पासून आपल्या सोबत काम केलेल्या जुन्या शिलेदारांच्या आठवणी जागवल्या. जे आजही हयात आहेत त्यांची अस्थेवाईकपने चौकशी केली तर, जे सोडून गेले त्यांचीही आवर्जून आठवण काढली.