NEET-UG Final Result out: NEET-UG चा सुधारित अंतिम निकाल जाहीर, तुमच्या रँकवर किती फरक पडलाय? तपासा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुधारणा
सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) नीटबाबत आपला निकाल दिल्यानंतर आज नॅशनल टेस्टींग एजन्सीने परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल जाहीर केला आहे. या नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला असून भौतिकशास्त्राचे देण्यात आलेले बोनस मार्क परत घेण्याच्या निर्णयानंतर या निकालात सुधारणा करण्यात आली आहे.
दरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट यूजीचा सुधारित निकाल दोन दिवसांच्या आत जाहीर केला जाईल असे सांगितले होते. त्यानंतर हा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे. नीट युजीचा हा अंतिम निकाल असून अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहे.
सुधारित निकाल का लावण्यात आला?
यापूर्वी नॅशनल टेस्टींग एजन्सीने काही विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांसह भरपाई देण्याचे मान्य केले होते. १२ एनसीआरटीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकावर आधारित असणाऱ्या प्रश्नाच्या दोन उत्तरे बरोबर असल्याचा वाद होता. चिन्हांकित केलेले एकच उत्तर अचूक असेल आणि इतर उत्तरे चिन्हांकित करणाऱ्यांना त्याचे गुण मिळणार नाहीत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे ज्या ४४ उमेदवारांचे गुण ७२० पैकी ७२० पर्यंत पोहोचले त्यांना आता उणे ५ गुणांचा सामना करावा लागणार आहे.
नेमका प्रकार काय?
गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा आहे. मे महिन्यात ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत पेपरफुटीसह गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 40 पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय चाचणी संस्थेला अर्थात एनटीएला केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एनटीएकडून NEET UG परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आला.
यंदाच्या नीट परीक्षेचा पेपर झारखंडमधील हजारीबाग शहरात परीक्षेच्या 45 मिनिटं आधी फोडण्यात आला. त्यानंतर या पेपरमधील प्रश्नांची उत्तरं विकण्यात आल्याचा दावा एनटीएने न्यायालयात केला होता. या दाव्याविषयी सर्वोच्च न्यायालयाकडून शंका उपस्थित करण्यात आली होती. फक्त 45 मिनिटांत 180 प्रश्नांची उत्तरं सोडवून ती पेपर विकत घेणाऱ्यांना पुरवण्यात आली. ही उत्तरं पाठ करून विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला, या एनटीएच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.