तन, मन, धनाने, सर्वशक्तीनिशी शेकापसोबत राहणार; मुंबईकर नागरिकांची स्नेहमेळाव्यात ग्वाही
सांगोला(प्रतिनिधी):- स्व.आबासाहेबांना तुम्ही 50-55 वर्षे निस्वार्थपणे साथ दिली आहे. हे मी व देशमुख कुटुंबिय कदापिही विसरु शकत नाही. आज आबासाहेब आपल्यात नाहीत याचे मनाला खुप मोठे दु:ख आहे. आबासाहेब जरी आपल्या सोबत नसतील तर त्यांनी रुजविलेल्या पुरोगामी विचारांची मोठी अदृश्य शक्ती आपल्या सोबत आहे.त्यामुळे आबासाहेबांच्या विचारांवर आम्ही वाटचाल करत असून तुम्ही सर्वांनी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून आम्हाला लढण्याची प्रेरणा द्यावी असे भावनिक आवाहन करत आबासाहेबांच्याच पुरोगामी विचारांची आज सांगोला तालुक्याला गरज आहे. मुंबई, पुण्यामध्ये राहणार्या नागरिकांचे काय हाल होतात हे मी जवळून पाहिले आहे त्यामुळे येणार्या काळात स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध करुन देण्याचा शेकापक्षाचा अजेंडा असल्याचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
मुंबईत वास्तव्यास असलेल्या सांगोलकरांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी संवाद साधण्यासाठी रविवार दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबईतील सांगोला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्नेह मेळाव्यास नागरिक, विद्यार्थ्यांस महिलांची संख्या लक्षनीय होती. या स्नेह मेळाव्याप्रसंगी डॉ.बाबासाहेब देशमुख बोलत होते.
मुंबईत शेकापक्षाच्या हक्काच्या सांगोलकरांनी केलेले भव्य दिव्य स्वागत पाहून डॉ.बाबासाहेब देशमुख भावुक झाले होते. मुंबईकरांनी आजवर देशमुख कुटुबियांना कधीही निराश केले नाही. स्व.आबासाहेबांनी आजवर केलेल्या निस्वार्थ आणि निरपेक्ष कामाची ही पोहचपावती असून मुंबईकरांसाठी यापुढील काळात आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मुंबईकरांसोबत संवाद साधताना त्यांच्या अडचणींची माहिती घेतली.तालुक्यातील अनेक नागरिक उपजीविकेसाठी मुंबईत वास्तव्यास आहेत,आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर आपण त्यांच्यामागे निस्वार्थपणे शेवटच्या श्वासापर्यंत ठामपणे उभे राहू असा विश्वास त्यांना दिला.
या मेळाव्यासाठी मुंबईकरांनी कुटुंबीयांसह प्रचंड गर्दी करून डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्याशी संवाद साधला त्याचप्रमाणे येणार्या निवडणुकीत शेकापचाच आमदार करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.स्व.भाई.गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा ते कृतीतून चालवित आहेत. त्यामुळे विकासाचे व्हिजन असलेल्या डॉ.बाबासाहेब देशमुख यांना विधानसभेत पाठवणे काळाची गरज असून येणार्या काळात डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ देण्याची ग्वाही दिली.
मुंबई येथील स्नेह मेळाव्यास सांगोला तालुक्यातील नागरिकांनी स्वखर्चाने मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने या स्नेह मेळाव्याची संपूर्ण सांगोला तालुक्यात मोठी चर्चा सुरु आहे. मुंबईत डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या स्वागताला मोठी गर्दी उसळली होती.या सभेला सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.