सांगोला विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाचा कोणताही परिणाम सांगोल्यात होणार नाही असा दावा भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी केला आहे . आज सांगोला विधानसभेसाठी भाजपची बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील हे दूषित विचाराने सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. आता ते उमेदवार उभे करायचं म्हणत असतील तर त्यांना 288 मतदारसंघात उमेदवार जरी मिळाले तरी खूप आहे असा टोला केदार यांनी लगावला. जरांगे पाटील यांनी कितीही उमेदवार उभे करु देत त्याचा सांगोल्यात कोणताही परिणाम होणार नसून सांगोल्यात महायुतीचा मोठा विजय होईल असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी दीपक साळुंखे पाटील यांनी मशाल हाती घेतल्याने काय फरक पडेल यावर ही चर्चा करण्यात आली. दीपक साळुंखे यांच्या जाण्याने कोणताही फरक महायुतीच्या उमेदवाराला पडणार नसून अगदी शे पाचशे मते देखील कमी होणार नाहीत असा दावा केदार यांनी केला. महाविकास आघाडीत देखील उद्धव ठाकरेंच्या भूमिकेने बिघाडी झाल्यामुळे महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असे केदार यांनी सांगितले.
वास्तविक सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनं सांगोल्यात मोठा बिघाड झाला असून आता शेतकरी कामगार पक्षाकडूनही निवडणूक लढवली जाणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या मागे शरद पवार यांची छुपी ताकद राहणार असल्याने याचा फायदा थेट शहाजीबापू पाटील यांना होईल असेही चेतन सिंह केदार यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दीपक आबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाकरेंनी त्यांना सांगोला विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळं ठाकरेंनी जर दीपक आबा साळुंखे पाटील यांना संधी दिली तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण शेकाप हा देखील महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. त्यामुळं शेकाप सांगोल्यातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.