सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी इतिहास विभागामार्फत गड-किल्ले भित्तीपत्रक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षक म्हणून डॉ.प्रभाकर कोळेकर विभागप्रमुख, प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर उपस्थित होते. याप्रसंगी संस्था सदस्य मा.श्री सु.ग.फुले साहेब, प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले,इतिहास विभागप्रमुख डॉ.सदाशिव देवकर,डॉ.महेश घाडगे, डॉ.अर्जुन मासाळ, डॉ.बबन गायकवाड, डॉ.विद्या जाधव, डॉ.राम पवार, सोलापूर विद्यापीठाचे प्रा.तारिक तांबोळी उपस्थित होते.
मराठा राजवटीच्या सामरिक लष्करी शक्तींचे प्रदर्शन करतात, महाराष्ट्रात 390 हून अधिक किल्ले आहेत त्यापैकी “मराठा मिलिटरी लँडस्केप” अंतर्गत रायगड, शिवनेरी, लोहगड, पन्हाळा, विजयदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, साल्हेर आणि सिंधुदुर्ग हे किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी हे किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याकरिता युनेस्को कडे पाठवले आहेत व या किल्ल्यांची पाहणी देखील या समितीकडून झाली आहे हि अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. १२ किल्ल्यांपैकी आठ भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित आहेत तर चार पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र सरकार द्वारे संरक्षित आहेत. गडकोट म्हणजे एक प्रचंड शक्ती होती. या गडकिल्यांच्या आश्रयानेच अनेकांनी राज्ये उभारली. आपल्या महाराजांच्या स्वराज्याला हातभार लावणारे हेच ते गडकोट. ‘संपूर्ण राज्याचे सारं ते दुर्ग’ या एकाच वाक्यात रामचंद्र पंत अमात्यांनी किल्ल्यांचे महत्व स्पष्ट केले आहे.
गडकिल्ल्यांचा देश म्हणजे महाराष्ट्र. जगाच्या पाठीवर एवढ्या मोठ्या संख्येने किल्ले असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. महाराष्ट्राचे वर्णन करताना कवी म्हणतात राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. हेच गड किल्ले म्हणजे स्वराज्याची राज्य लक्ष्मीचं. इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. हा इतिहास नुसताच पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी बघितला पाहिजे. हे गड चढले पाहिजेत, तिथे फिरले पाहिजे, त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवले पाहिजे आणि स्थापत्त्यकलेचा नमुना अभ्यासला पाहिजे. कारण आजचा महाराष्ट्र हा याच इतिहासाच्या कर्तबगारीवर उभा आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेतून बोध घेऊनच आपण आपले भविष्य घडवू शकतो आणि आपली पुढची पिढी कालचा हा उज्ज्वल इतिहास जाणूनच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.सदरील स्पर्धे मध्ये एकूण २७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षक डॉ.प्रभाकर कोळेकर यांनी विद्यार्थ्यांची स्तुती केली व कौतुकाची थाप देखील दिली व यातून उत्कृष भित्तीपत्रकांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे क्रमांक देण्यात आले.