सांगोला तालुकाराजकीय

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडून खा. शरदचंद्र पवार यांनी घेतला जिल्ह्याच्या राजकारणाचा आढावा; रयत शिक्षण संस्थेच्या सदस्य नियुक्तीचे पत्रही दिपकआबांना प्रदान

सोलापूर जिल्ह्यातील खा. शरदचंद्रजी पवार यांचे विश्वासू शिलेदार अशी ओळख असलेल्या माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांची सोमवार दि 23 रोजी बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत खा. शरदचंद्रजी पवार यांनी दिपकआबाकडून सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदाचे नियुक्तीपत्रही यावेळी खा. शरदचंद्रजी पवार यांनी दिले.
एकेकाळी सोलापूर जिल्हा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या जिल्ह्याची ओळख होती. शिवाय जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून खुद्द शरदचंद्रजी पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवल्यामुळे या जिल्ह्यावर शरदचंद्रजी पवार यांचे विशेष प्रेम आहे. अशा परिस्थितीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती बाबतही या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. जिल्ह्यातील पक्ष संघटन वाढवून पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी काही ठोस आणि धोरणात्मक निर्णय घेणे सध्या गरजेचे बनले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन वाढवून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी खा. शरदचंद्रजी पवार व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यात सविस्तर चर्चा झाली. पक्षीय विस्ताराबरोबरच या बैठकीत सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीवर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तसेच सांगोला तालुक्यातील तेल्या, मर आणि पिन होल बोरर या रोगामुळे अडचणीत आलेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याविषयी आणि तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या डाळिंब बागांच्या सध्यस्थितीवरही या बैठकीत चर्चा झाली.

 

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची त्यांच्या जन्मदिनीच म्हणजे ७ जानेवारी रोजी पेट्रोनमधून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड करून खा. शरदचंद्रजी पवार यांनी त्यांना वाढदिवसाची भेट दिली होती. या निवडीचे नियुक्तीपत्रही सोमवार दिनांक 23 रोजी झालेल्या बैठकीत खा. शरदचंद्रजी पवार यांनी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना प्रदान केले. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी विद्या विकास मंडळच्या माध्यमातून ३५ हून अधिक वर्षे अनेक माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि महाविद्यालय यांचा यशस्वीपने कारभार पाहिला आहे. शिवाय त्यांनी आपल्या शिक्षणाचे धडेही रयत शिक्षण संस्थेतच गिरवले आहेत. या शैक्षणिक कामाचा अनुभव रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी उपयोगी पडेल असा विश्वास व्यक्त करून त्यांनी यापुढील काळात रयत शिक्षण संस्थेच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही या बैठकीत खा. शरदचंद्रजी पवार यांनी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!