तालुक्यात दोन शेतकऱ्यांना विषारी सापाने केले सर्पदंश ; वेळीच उपचार मिळाल्याने वाचला जीव 

 

 

सांगोला तालुक्यात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतात मशागतीच्या व पेरणीच्या कामाला वेग आला आहे. त्यातच पावसाने ठिकठिकाणी गवताचे साम्राज्य पसरले आहे. पावसाने नदी, नाले, ओढे, शेत, वस्त्यांसह जनावरांच्या गोठ्यात विषारी, बिनविषारी सापांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. दरम्यान, सांगोला तालुक्यात दोन शेतकऱ्यांना घोणस या विषारी सापाने सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने, त्यांना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

सर्पदंश झालेल्या रुग्णांवरील उपचारात हलगर्जी होऊ नये, यासाठी वैद्यकीय यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.
पावसाळ्याच्या दिवसात साप बाहेर येत असतात. या काळात शेतात काम करत असताना किंवा अडगडीच्या ठिकाणी बसलेले साप दंश करत असतात. सांगोला तालुक्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामांना प्राधान्य दिले आहे. वाड्या वस्त्यांवरील घरे, झोपड्यांत, जनावरांच्या गोठ्यात किंबहुना पाला- पाचोळ्याच्या ठिकाणी साप आश्रयाला येतात. नेमके त्या ठिकाणी धक्का लागल्याने सर्पदंश झाल्याच्या घटना घडत आहेत. शेतकरी हा आपल्या दैनंदिन कामात असल्यामुळे शेतात काम करताना सर्पदंशांचा घटनांमध्ये वाढ झाली असून गेल्या आठवड्यात दोन शेतकऱ्यांना घोणस या विषारी सापाने सर्पदंश केला असून त्यात एका शेतकरी महिलेला देखील सर्पदंश झाला आहे.

 

सुदैवाने सर्पदंश झालेल्या दोन्ही शेतकऱ्यांना वेळीच उपचार मिळाले. सर्पदंश झाल्याने नातेवाईकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती सुधारत आहे.
आसपास साप, नाग येवू नये यासाठी घराजवळ पालापाचोळा, कचऱ्याचे ढिग, दगड- विटाचे ढिग, लाकडांचा साठा करुन ठेऊ नये. खिडक्या- दरवाजे यांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अंधारातून जाताना नेहमी बॅटरी सोबत बाळगावी. रात्री शक्यतोवर जमिनीवर झोपू नये कारण साप हा निशाचर असतात आणि त्यांचा वावर रात्रीला असतो. पेरणी व नांगरणीवेळी शेताच्या परिसरात वावरणाऱ्या या सरपटणाऱ्‍या प्राण्याच्या अधिवासाला धोका पोहचतो. त्यामुळे सरपटणारे प्राणी शेतकऱ्यांना दंश करतात. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य यंत्रणेसह सर्पमित्रांनी केले आहे.

पावसाळ्याच्या दिवसात साप, नाग, घोणस बाहेर येत असल्याने घराजवळ अडगळ करू नये. घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. शेतातून किंवा गवतातून चालताना पायात बूट असावेत. दुचाकीची खोपडी, सीटखाली साप आढळून आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. – संदेश पलसे, सर्पमित्र सांगोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button