महुद येथील श्री छ.शिवाजी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
जुन्या आठवणींना दिला उजाळा
महुद(प्रतिनिधी):-तब्बल 28 वर्षांनंतर एकत्र शिक्षण घेतल्यानंतर एकमेकांपासून दुरावलेल्या जीवलग मित्रांची भेट झाली. 1994-95 मध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेनंतर आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटा शोधण्यासाठी बाहेर पडलेले वर्गमित्र एकत्रित भेटले. निमित्त होते 1994-1995 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचे शालेय जीवनातील टोपण नावाने हाका मारत व जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी हा स्नेहमेळावा अविस्मरणीय केला.
अॅड.प्रदीप लवटे, अॅड.धनंजय मेटकरी, प्राथमिक शिक्षक प्रदीप दिवटे, प्रदीप चव्हाण यांनी जुन्या मित्रांच्या स्नेहमेळाव्याची संकल्पना मांडल्यानंतर मकरंद बर्वे, प्रमोद महाजन, नागेश साखरे, गणेश साखरे यांच्यासह आदी सहकारी मित्रांनी व मुलींनी कार्यक्रमास होकार देत एकमेकांशी संपर्क साधला. व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने राज्यातील विविध शहरासह परराज्यात स्थायिक झालेले अनेक गावातील वर्गमित्र या स्नेहमेळाव्याला हजर होते.
28 वर्षांनंतर एकमेकांच्या संपर्कात आलेल्या या सवंगड्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. सर्वच वर्गमित्रांनी 5 वी ते 10 पर्यंत शिक्षण काळातील शायलेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. अनेक मजेशीर किस्से सर्वांनी एकमेकांना मुक्तपणे सांगितले. एकमेकांशी खुशाली जाणू घेत ज्यांच्यामुळे आपण घडाले, त्या गुरूंबद्दलही सर्वांनी आदर व्यक्त केला. शेती, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेल्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी केलेल्या संस्काराचे कौतुक केले. तत्कालीन शिक्षकांचे श्रीफळ, शाल, देऊन सन्मान करण्यात आला. स्नेहभोजनानंतर सूर्य मावळतीला लागला. तसा निरोपाचा क्षण जवळजवळ येऊ लागताच अनेकांना आजचा दिवस मावळूच नये असे वाटत होते. मात्र वेळ कोणाालाही थांबत नाही. अखेर मित्रांना गप्पांचा फड आवरता घ्यावा लागला. स्नेहमेळाव्याची अखेर सांगता झाली. चला, भेटू पुन्हा नक्कीच असं म्हणत सर्वच मित्रांनी भरल्या डोळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. यावेळी पत्रकार दिपक धोकटे, राजू केदार, आमद मुलाणी, शिला पाटील, गीता लोखंडे, उज्वला लोखंडे, नाझनीन शेख आदी उपस्थित होते.