अखंड भारत देशाचे प्रेरणास्थान आणि अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना होणे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आणि शक्तिशाली पुतळा उभा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी गुरुवार दि 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सहकार कार्याध्यक्ष आणि जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे, जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ, कार्याध्यक्ष अस्लम चौधरी, लेबर फेडरेशनचे व्हा चेअरमन मुजीब शेख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे, कार्याध्यक्ष उज्वला पाटील, महिला संघटक पाटील मॅडम, मंगळवेढा तालुकाध्यक्ष भारत बेदरे, यांच्यासह जेष्ठ नेते बिराजदार सर, राज साळुंखे आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा शासन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटनाग्रस्त झाला. ही बाब अत्यंत वेदनादायक आणि मनाला संताप आणणारी आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असताना अक्षम्य त्रुटी झाल्याचेच यावरून समोर येत आहे. केवळ आठ महिन्यात पुतळा दुर्घटनाग्रस्त होतो हे अनाकलनीय आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. आणि जराही विलंब न करता मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे भव्य स्मारक आणि शक्तिशाली पुतळा उभा करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
———————————————–
भारतीय नौदलाचे जनक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहेत. शासन आणि प्रशासनाने महाराष्ट्रातील लोकभावनेचा विचार करून याप्रकरणी तात्काळ योग्य ती पावले उचलावीत. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेच्या भावनेचा आदर करून सरकारने तात्काळ राजकोट येथील किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या दैदीप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा उभा करावा. अन्यथा शिवप्रेमींच्या तीव्र भावनांचा शासनाला सामना करावा लागेल.
मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील