शेतकऱ्यांनी एक रुपया भरुन पीक विमा योजनेत नोंदणी करावी- कृषि आयुक्त- सुनिल चव्हाण
सोलापुर- राज्य शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी सामुहिक सेवा केंद्रचालकांकडे केवळ १ रुपया भरून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी. अतिरिक्त पैशाची मागणी केल्यास आपल्या संबंधित विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार किंवा तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी केले आहे.
शेतक-यांना केवळ एक रुपया भरून PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्रामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज ४० रुपये देण्यात येतात. राज्यातील काही सामुहिक सेवा केंद्र धारकाकडून शेतक-यांकडून अतिरीक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामाकरिता ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.सन २०२३ – २४ पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. राज्यातील जास्ती-जास्त शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागी व्हावे असे, आवाहनही कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी केले आहे.