गटशिक्षण अधिकार्यांमुळे संयमाचा कडेलोट; शिक्षण विभागाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह
सांगोला(प्रतिनिधी):- त्याच असं झालं कि चोपडी केंद्रशाळेच्या अंतर्गत असणार्या भोजलिंगवडी प्राथमिक शाळेतील दोनपैकी एका शिक्षकाची पाच महिन्यापूर्वी बदली झाली. बदलून गेलेल्या शिक्षकाच्या जागी दुसरा शिक्षक हजर होणं अपेक्षित असताना तस झालं नाही. महिनाभर वाट बघून शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी यासाठी विनंत्या, निवेदने या माध्यमातून पाठपुरावा केला. परंतु त्याला यश आले नाही.
आधीच कोरोनामुळे दोन वर्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही. त्यातच बहुतांश मुलांचे पालक हे शेतकरी व शेतमजूर आहेत. त्यामुळे घरातून काही मार्गदर्शन मिळण्याची शक्यता कमीच. त्यात आता शाळा सुरु होऊन 6 महिने झाले तर शिक्षक मिळेना. मुलाचे होणारे हे शैक्षणिक नुकसान न बघवल्यामुळे पालकांनी गटशिक्षण अधिकार्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे ठरवले. तशी लेखी नोटीस गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी याना देण्यात आली.
नेमक्या आंदोलनाच्या दिवशी गटशिक्षणाधिकारी यांनी भल्या सकाळी भ्रमणध्वनीवरून आंदोलकांशी संपर्क साधत चर्चा केली. त्यामध्ये सोमवारी म्हणजे दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी शिक्षक शाळेवर हजर होतील असे सांगितले. शिक्षण विभागातील एक उच्चपदस्थ अधिकारी हे सांगत आहे, हीच मंडळी पुढील पिढीला मुल्यशिक्षणाचे धडे देत असतात त्यामुळे पालकांनी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन करण्यात येणारे आंदोलन स्थगित केले.
गटशिक्षण अधिकार्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सोमवारी शिक्षक हजर होणे अपेक्षित असताना तसं झाल नाही. पुन्हा पालकांनी याबाबत संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधला असता ते शिक्षक गुरुवारी शाळेवर हजर होतील आणि तसे आदेश संबंधित केंद्रप्रमुखाना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पुन्हा गुरुवारी तेच झाल आणि संबंधित केंद्रप्रमुखानी आपल्याकडे शिक्षक उपलब्द नसल्याचे सांगितले.जाब विचारण्यासाठी गटशिक्षण अधिकार्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सराईतपणे भ्रमणध्वनी बंद करून ते नॉट रिचेबल झाले.
वारंवार झालेल्या फसवणुकीमुळे संतापलेल्या पालकांनी बैठक घेऊन लवकरच यासाठी उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. तसेच झालेला अशोभनीय प्रकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण विभागाचे सचिव तसेच सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पत्राद्वारे कळण्याचा निर्णय घेतला आहे.