सोनंद येथील नुकसानग्रस्त द्राक्षे बागांची मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली पाहणी
बळीराजाला दिलासा देण्यासाठी मा. आ. दिपकआबा साळुंखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर ; शेतकऱ्यांसमोरच आबांनी लावला कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांना फोन

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसल्याने सांगोला तालुक्यातील सोनंद व परिसरातील द्राक्षे बागांचे मोठे नुकसान झाले आहे. हातात तोंडाला आलेली फळबाग डोळ्यासमोर उध्वस्त होत झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष, मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी थेट बांधावर जाऊन बळीराजाला दिलासा दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोरच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोनवरून सविस्तर माहिती दिली. यासह तहसीलदार व कृषी अधिकारी यांना फोन करून तातडीने पंचनामे करावेत आणि त्या संदर्भात चा अहवाल तात्काळ वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवावा आणि बळीराजाला न्याय मिळवून द्यावा अशा सूचना केल्या.
मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी सांगोला शहर आणि तालुक्यातील काही भागाला वादळी वार्यासह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामध्ये तालुक्यातील द्राक्ष बागायतदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने सोनंद व या परिसरातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाजारपेठेत जाण्यासाठी तयार मालांचे लाखो – कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अवकाळीने नुकसान झालेल्या सांगोला तालुक्यातील बागांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे त्या मागणीनुसार थेट कृषिमंत्री यांच्याशी संपर्क साधून येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, पावसाच्या लहरीपणामुळे शेती उद्योग अडचणीत सापडला पाणीटंचाईचा सामना करत असताना येथील बहाद्दर शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने कमी पाण्यावर चांगल्या प्रकारे शेती पिकवली यामुळे तालुक्यात पिकलेले द्राक्ष डाळिंब हे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहे. मात्र पाणीटंचाई बरोबर आसमानी संकटाचा सामना करताना शेतकरी पुरता दमला आहे. अशा परिस्थितीमध्ये बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितपणे आमची प्रामाणिक भूमिका असणार आहे. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आमची मागणी असून, यासंदर्भात मी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष दिपकआबांनी सांगितले.
यावेळी विजय बाबर, बाळासाहेब ढगे, रवी तेली, समाधान पाटील आणि मुकेश काशीद यांच्या नुकसानग्रस्त द्राक्षे बागांची पाहणी केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सतीश काशीद पाटील, मा. उपसरपंच डॉ. विजय काशीद, प्रवीण पाटील, अतुल पाटील, प्रकाश काशीद, राजाराम काशीद, उपसरपंच साहेबराव काशीद, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन तुकाराम काशीद, प्रशांत काशीद, धनंजय भिंगे, नानासो बोराडे, शरद बाबर, विश्वासराव काशीद, बाळासाहेब ढगे, राजकुमार बाबर, ॲड. समाधान काशीद, रवी तेली, आनंदराव शिंदे, वैभव काशीद, राजू पाटील, प्रशांत कोळसे आदी उपस्थित होते.