जनावरे चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा- डॉ.अनिकेत देशमुख
पशुधनाच्या वाढत्या चोर्यांमुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला शहरासह ग्रामीण भागात भुरट्या चोर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. जनावरे, मोबाईल चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. ग्रामीण भागात शेतमळ्यातून जनावरे चोरीचे प्रकार घडू लागले आहेत.सांगोला तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून खेडेगावातून जनावरे चोरीचे प्रकार वाढत चालले आहेत. पोलीसांनी जनावरे चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी स्व.भाई.गणपतराव देशमुख यांचे नातू, शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी केले आहे.
सांगोला तालुक्यात मागील तीन ते चार महिन्यापासून शेतकर्याच्या घरासमोरून रात्रीच्या वेळी शेळ्या, मेंढ्या, बोकड, जर्सी पाडी, रेडी, म्हैस अशा किमती पशुधनाच्या मोठ्या प्रमाणात चोर्या झाल्या आहेत. यासाठी चोरटे ओमनी, पीकअप अश्या गाड्यांचा वापर करीत असून त्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश येत आहे.कायम दुष्काळाने ग्रासलेल्या सांगोला तालुक्यात शेतीसाठी पाणी कमी असल्याने शेतकरी पशुपालना सारखा पूरक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. अनेक गरीब कुटुंबाचा प्रपंच केवळ शेळ्या बोकड पाळून चालविला जात आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून शेळी, बोकड, म्हैस आदी जनावरे चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. जनावरे चोरट्यांना जेरबंद करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
वारंवार घडणार्या घटनांमुळे सांगोला तालुक्यातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगोला तालुक्यातील खेडेगावामध्ये रात्रीच्या सुमारास गोठ्यातून तसेच, शेतातून गाय व बैल अशी एकही जागा शिल्लक नाही, जिथून जनावरे चोरीला जात नाहीत , जनावरे चोर्यासाठी टोळी कार्यरत आहेत, तक्रार देण्यास गेल्यावर तक्रार लवकर घेतली जात नाही, तक्रार देण्यास गेल्यावर आमचीच उलटतपासणी केली जाते यासह अनेक तक्रारी पशुपालक शेतकर्यांनी डॉ.अनिकेत देशमुख यांच्याकडे केल्या आहेत.
सांगोला तालुक्यात गेल्या काही महिन्यात जनावरांच्या चोरीच्या घटनेत वाढ झाली असून याचा तपास योग्य पध्दतीने करुन चोरट्यांना शोधून पोलीसांनी तात्काळ ताब्यात घ्यावे अशी मागणी डॉ.अनिकेत देशमुख यांनी केली आहे.