सांगोला तालुक्यातील १ लाख १९ हजार शेतकऱ्यांना मिळणार १५७ कोटींची मदत – आ.शहाजीबापू पाटील; दुष्काळामुळे खरीप पिकांचे नुकसान, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता
सांगोला (प्रतिनिधी): खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी सांगोला तालुक्यातील १ लाख १९ हजार ३४२ शेतकऱ्यांना १५७ कोटी ०७ लाख ६७ हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना हा निधी उपलब्ध होणार असल्याने या शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळेल. तसेच या निर्णयामुळे राज्य शासनाने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याचा विश्वास, आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यातील ४० तालुक्यांमध्ये खरीप हंगाम २०२३ मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यामध्ये सांगोला तालुक्याचा समावेश करण्यात आला होता. सांगोला तालुक्यात २ हेक्टर मर्यादेत ४४ हजार ०६७ हेक्टर जिरायत, २१ हजार ५४३ हेक्टर बागायत, १४ हजार १९९ हेक्टर बहुवार्षिक पिके असे ७९ हजार ८१० हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. २ ते ३ हेक्टर मर्यादेत २४ हजार ०६५ हेक्टर जिरायत, १० हजार ३६१ हेक्टर बागायत, ५ हजार ७६७ हेक्टर बहुवार्षिकपिके असे ४० हजार २९३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. २ हेक्टर मर्यादेत (२२४५- २४३४) ३ हजार ७४५ हेक्टर जिरायत, ३ हजार ६६२ हेक्टर बागायत, ३ हजार १९४ हेक्टर बहुवार्षिकपिके असे १० हजार ६०३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. २ ते ३ हेक्टर मर्यादेत (२२४५-२१६७) २ हजार ९४५ हेक्टर जिरायत, १ हजार ७६१ हेक्टर बागायत, १ हजार २९७ हेक्टर बहुवार्षिकपिके असे ५ हजार १०४ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी सांगोला तालुक्यातील १ लाख १९ हजार ३४२ शेतकऱ्यांना १५७ कोटी ०७ लाख ६७ हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली होती. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना ही मदत होणार आहे. हा शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.