*कोल्हापूर- सोलापूर- कोल्हापूर रेल्वे सेवा पूर्ववत करा :-अशोक कामटे संघटना*
सांगोला (प्रतिनिधी):-सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने कुर्डूवाडी -मिरज- कोल्हापूर रेल्वे सेवा सुरू करण्याचि आग्रही मागणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कुर्डूवाडी येथून दुपारी 1.30 च्या सुमारास परळी -मिरज पॅसेंजर गेल्यानंतर या मार्गावर जाण्याकरिता किमान 21 तास तरी कोणतीही रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे.पंढरपूर ,सांगोला, ढालगाव, कवठेमंकाळ,मिरज ,कोल्हापूर या ठिकाणी जाण्याकरता या 22 तासांमध्ये मोठी गैरसोय होत आहे. कुर्डूवाडी पासून कोल्हापूर पर्यंत सर्व थांबे घेणारी दैनंदिन रेल्वे या मार्गावर तात्काळ सुरू करावी , तसेच कोरोनापूर्वीची सायंकाळीची कोल्हापूर – सोलापूर- कोल्हापूर उपयुक्त रेल्वे सेवा पूर्ववत करावी.अशी सर्वच गावातील प्रवासी, नागरिकांनी अशोक कामटे संघटनेकडे मागणी केलेली आहे.
तसेच रेल्वे क्रमांक 01139 नागपूर- मडगाव (गोवा) रेल्वे ही लातूर, धाराशिव ,कुर्डूवाडी ,पंढरपूर मिरज मार्गे ही रेल्वे सेवा सुरू केल्यास पूर्वीपेक्षा अंतर कमी होऊन प्रवाशांची सोय होणार आहे. या निवेदनाच्या प्रती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, खासदार धैर्यशील मोहिते -पाटील, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांच्याकडेही अशोक कामटे संघटनेने मागणी केली आहे.
प्रवाशांकरिता गोव्याला जाण्याकरिता हजरत निजामुद्दीन- वास्को एक्सप्रेस या रेल्वेचा एकच पर्याय असल्याने प्रचंड प्रवाशांची गैरसोय होत आहे.01139 नागपूर- मडगाव जंक्शन ही रेल्वे अकोल्यावरून भुसावळ व कल्याण मार्गे कोकणला न जाता सुधारित मार्ग वाशिम ,हिंगोली ,परळी, पंढरपूर, सांगोला, मिरज ,बेळगाव मार्गे सोडल्यास कोकण मार्गपेक्षा या मार्गाचे अंतर 200 किमीने कमी होऊन गोव्याला जाण्याकरता थेट रेल्वे सेवा महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यातील प्रवाशांकरिता उपलब्ध होईल याकरिता अशोक कामटे संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे.
नीलकंठ शिंदे सर ,संस्थापक:- शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना ,सांगोला