दिपकआबांच्या कामाचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न करू नये ; छावणी चालक प्रवीण नवले

गेली ५ वर्ष सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांचा प्रलंबित अनुदानाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित होता. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सातत्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून छावणी चालकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. दिपकआबांनी केलेल्या कामाचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न करू नये असे प्रतिपादन चारा छावणी चालक प्रवीण नवले यांनी केले.

 

त्यावेळी बोलताना छावणी चालक नवले म्हणाले, माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी प्रत्येक वेळी चारा छावणी चालक संघटनेच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांच्याशी बैठका केल्या आहेत. त्या प्रत्येक बैठकीचे आणि दिपकआबांनी केलेल्या पाठपुराव्याचे आम्ही सर्व चारा छावणी चालक साक्षीदार आहोत. तसेच दिपकआबांनी केलेल्या पाठपुराव्याची कबुली स्वतः राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनीही दिली आहे.

 

नामदार अनिल पाटील यांनी चारा छावणी चालकांची प्रलंबित अनुदान देण्याचा प्रश्न फक्त दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यामुळेच मार्गी लागला असून हे सर्व दिपकआबांचे यश असल्याचे आमच्या समोर कबूल केले आहे. याच्यापेक्षा मोठा पुरावा असू शकतं नाही त्यामुळे इतर राजकीय नेत्यांनी दिपकआबांनी केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये कारण चारा छावण्याचे प्रलंबित अनुदान मिळण्यासाठी एका छावणी चालकाने आपली जीवन यात्रा संपवली आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा तसेच जीवन मरणाचा होता. कुणीही या प्रश्नाचे राजकारण करू नये याचे संपूर्ण श्रेय माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचेच असल्याचा पुनरुच्चार शेवटी छावणी चालक प्रवीण नवले यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button