अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन
*जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे
कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप हंगाम 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकांसाठी 31 जुलै 2024 व उर्वरित पिकांसाठी 31 ऑगस्ट 2024 असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी :
* पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट आहे.
* स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.300 व आदिवासी गटासाठी रक्कम रु. 150 राहिल.
* स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
* पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर रपर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबत्तीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
* पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
.विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन. , 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धासाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/ पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.इ.
पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप- सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बषीस रक्कम तालुका पातळीवर पहिल्या क्रमांसाठी 5 हजार, द्वितीय क्रमांक 3 हजार, तिसरा क्रमांक 2 हजार, जिल्हा पातळी प्रथम क्रमांक 10 हजार, द्वितीय क्रमांक 7 हजार, तृतीय क्रमांक 5 हजार, राज्य पातळी प्रथम क्रमांक 50 हजार, द्वितीय क्रमांक 40 हजार, तृतीय क्रमांक 30 हजार अशा प्रकारे पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री गावसाने यांनी कळविले आहे.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यातर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.