लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंदमध्ये स्वागत सोहळा संपन्न
प्रशालेमध्ये शनिवार २०जुलै २०२४रोजी चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण होऊन अकरावीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष मा. इंजि. श्री बाबासाहेब भोसले साहेब, संस्था सचिव मा.श्री. आनंदराव भोसले साहेब, संस्था सदस्या सौ. अनिता भोसले मॅडम, संस्था सदस्या सौ. रजनी भोसले मॅडम इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य श्री. हेमंत आदलिंगे सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.पुष्पा महांकाळ, पर्यवेक्षक श्री. सुभाष आसबे सर, पर्यवेक्षिका सौ. सुषमा ढेबे मॅडम, प्रशालेचा व ज्यु. काॅलेजचा सर्व शिक्षकस्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
याप्रसंगी कॉलेजच्या विद्यार्थीनींनी कॉलेज विविध फुलांनी तसेच रंगीबेरंगी रांगोळी आणि फुग्यांनी सुशोभित क रुन,संपूर्ण शै. संकुलात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण केले होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फित कापून स्वागत सोहळा सुरु झाला. स्वागतगीत आणि सरस्वती पूजनानंतर , प्राचार्य हेमंत आदलिंगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्था पदाधिकारी तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक स्टाफचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
बारावीतील विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत त्यांना गुलाब पुष्प, पेन, शुभेच्छा कार्ड देऊन केले . भेट दिलेल्या पेनातील शाईने पेपर्स लिहून शैक्षणिक वाटचाल यशाच्या शिखरावर चढावी, कॉलेजचे शिक्षण घेत असताना, न थकता गुलाबासारखे सुगंध पसरवून सदैव टवटवीत राहावे. या सर्व शुभेच्छा कार्डात उतरवून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. खारघर (नवी मुंबई)शहरात जाऊन, बांधकाम व्यवसायामध्ये अग्रगण्य नांवामध्ये आपले नाव कोरणारे ,दोन्ही बंधूंनी शहरातील जीवन, शिक्षण पाहून आपल्या सोनंद व परिसरातील मुलांना सुद्धा अल्प फीमध्ये शिक्षण मिळावे हाच उदात्त हेतू मनामध्ये ठेवून जवळा रेल्वे स्टेशनजवळ शहरातील शाळा ,कॉलेजांना लाजवेल अशा भव्य इमारतीसह सर्व सोयी-सुविधायुक्त शैक्षणिक संकुल उभा केले. अल्पावधीतच शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवून प्रशालेचा नावलौकिक वाढविला.
संस्था अध्यक्ष इंजि.भोसले साहेब म्हणाले की, विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास आहे . दरवर्षी दहावी,बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लावून सर्व शिक्षक सुद्धा त्यांचे ध्येयपूर्ती करण्यास सक्षम आहेत. शिक्षकांचा गुणगौरव करण्यास ते विसरले नाहीत. विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर संस्था सचिव श्री. आनंदराव भोसले , प्राचार्य आदलिंगे सर प्रशालेचे संगीत शिक्षक श्री. अमोल केंगार सरांनी गायनाची मैफिल रंगवून प्रशालेचे वातावरण अगदी मंत्रमुग्ध करून टाकले.
नवोदित विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या एका महिन्याच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगितले की, आम्हाला सर्व शिक्षक शिक्षणाबरोबरच एक आदर्श व्यक्तिमत्व कसे घडवावे,अभ्यास करून भावी आयुष्यामध्ये एक कर्तृत्ववान नागरिक बनण्यासाठी सल्ले देण्यासाठी सदैव तत्पर असतात. काही विद्यार्थीनींनी प्रशालेवर केलेल्या चारोळ्या म्हणून दाखविल्या. यानिमित्त विद्यार्थ्यांनी सर्वांना खाऊ वाटप केले.
प्रा.सतीश कांबळे सरांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.