भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रक चालकाने एसटीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना चिरडल्याने सांगोला तालुक्यातील कटफळ येथील सहा महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता दरम्यान आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करून कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या सहसचिवांना दिले आहेत, अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
मंगळवार १८ जून २०२४ रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर- कराड रोडवरील चिकमहूद जवळ (बंडगरवाडी) पाटी येथे रोजंदारीने कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कटफळ गावासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या अपघातात आश्विनी शंकर सोनार, इंदुबाई बाबा इरकर, शिरमाबाई लक्ष्मण जाधव, कमल यल्लाप्पा बंडगर, सुलोचना रामा भोसले, मनीषा आदिनाथ पंडित सर्वजण रा. कटफळ ता.सांगोला यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर मिनाबाई दत्तात्रय बंडगर या गंभीर जखमी झाल्या होत्या. आमदार शहाजीबापू पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी २५ हजार रुपयांची व्यक्तिगत मदत दिली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या सहसचिवांना दिले आहेत. लवकरच कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.