सांगोला(प्रतिनिधी) :- सध्या राजकारणाच्या माध्यमातून समाजात होणारी अशुद्ध धर्माची उगवण लोकशाहीला घातक ठरत आहे.बाबा भारती यांचे विचार मूल्य पेरणारे आहेत,संस्कार पेरणारे आहेत सध्या विस्कटलेल्या समाजासाठी बाबा भारतीयांचे विचार म्हणजे अमृताची पेरणी आहे.बाबा भारती यांनी आयुष्यभर शिक्षकाची नोकरी करून समाजामध्ये माणसाचं सुख नक्की कशात आहे याचा शोध घेऊन जीवन मूल्यांची पेरणी केली.आज ज्यांना जीवनगौरव पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत असे प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी संस्थेच्या माध्यमातून समाजात चांगुलपणाचे संस्कार पेरले आहेत, म्हणून शिक्षक हाच देशाचा खरा नायक आहे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.सांगोला येथे लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने जीवनगौरव सन्मान व पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, प्रमुख उपस्थिती म्हणून लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, उद्योगपती सुदाम भोरे, मुख्य संयोजक पुरुषोत्तम सदाफुले,वैजनाथ घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड व पुरस्कार प्राप्त मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगोला विद्यामंदिर येथे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला व कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकशिक्षक बाबा भारती यांच्या प्रतिमेचे पूजन वृक्ष पूजन करून झाली.त्यानंतर प्रभाकर वाघोले यांनी लोकशिक्षक ही कविता वाचन केली. प्रास्ताविकातून संस्थेचे अध्यक्ष महेंद्र भारतीयांनी बाबा भारतीयांचे विचार व त्यांचे कार्य यांची संक्षिप्त ओळख करून दिली पुरस्काराची निवड कशा पद्धतीने झाली याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. जीवनगौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले.त्यानंतर प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,शीला झपके यांना औक्षण करून डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी व तुळशी हार घालून लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच कृषीनिष्ठ शेतकरी डॉ.मच्छिंद्र सोनलकर यांना लोकशिक्षक बाबा भारती कृषीभूषण पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ, शाखा- पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षा जयश्री जयंत श्रीखंडे यांना लोकशिक्षक बाबा भारती साहित्ययात्री पुरस्कार,ॲड.डॉ.सुगंध मोहन वाघमारे एम.ए.(पाली) पलूस, सांगली यांना लोकशिक्षक बाबा भारती पाली भाषा पुरस्कार, ‘हे शुभ शकुनांचे पक्षी’ या कवितासंग्रहासाठी कवी माधव पवार, सोलापूर यांना लोकशिक्षक बाबा भारती काव्यप्रतिभा पुरस्कार, साहित्यिक राम सर्वगौड, पुणे यांना ‘सोशल डिस्टन्स’ या ललित लेखनासाठी लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संयोजक पुरुषोत्तम सदाफुले यांनी मुलाखत घेत साहित्यिक राम सर्वगौड, कवी माधव पवार,.डॉ.सुगंध मोहन वाघमारे,जयश्री जयंत श्रीखंडे, डॉ.मच्छिंद्र सोनलकर या सर्व सत्कारमूर्तींनी केलेल्या कार्याची ओळख करून दिली.
जीवनगौरव सन्मानास उत्तर देताना प्रा.प्रबुद्धचंद्र झपके म्हणाले की प्राचीन बौद्ध वाङ्मयाचे पाली भाषेतील लेखन मराठीत करणारे व सुमारे २५ हजार शब्दांचा पाली-मराठी शब्दकोश तयार करणारे लोकशिक्षक बाबा भारती यांचे जीवन कार्य अगाध असून लोकशिक्षकांच्या नावे असणारा हा पुरस्कार लोकसाहित्यिकांच्या हस्ते मिळाला यात खऱ्या अर्थाने मी कृतार्थ झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आज समाजात शहरांमध्ये पैसे घेऊन संस्कार वर्ग चालवले जातात परंतु आजोबांच्या व वडिलांच्या संस्कारांमुळे आम्हाला कोणत्याही संस्कार वर्गात जाण्याची गरज भासली नाही. वडिलांच्या पावलांवरती पाऊल न ठेवता त्यांच्या पावलांवरती नतमस्तक होऊन आयुष्याची वाटचाल करण्यात जीवनाचे सार्थक असून परमपूज्य साने गुरुजी व कै.बापूसाहेबांच्या संस्काराचे मूर्त रूप हे आज विद्यामंदिरच्या रूपाने उभे आहे. वडिलांच्या पश्चात गेली ४३ वर्षे त्यांच्या तत्वाला तसूभरही मुरड न घालता विद्यामंदिरच्या गुणवत्तेचा ब्रँड सोलापूर जिल्ह्यात शिक्षकांच्या मदतीने तयार झाला असून शाळा ही फक्त इंजिनिअर्स-डॉक्टर्स तयार करण्याचे कारखाने न होता संस्कारक्षम नागरिक बनवण्यासाठी आम्ही कार्यरत असून यामध्ये येणारी आव्हाने पेलण्यासाठी शिक्षकांसह संस्था सदैव तयार असल्याचे प्रतिपादन करत भविष्यात आणखी उद्दिष्टे साध्य करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. कोणताही प्रस्ताव न देता प्रत्यक्षात कार्याचा अनुभव घेत, कार्यक्षेत्रात येऊन सन्मान करणाऱ्या लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान या संस्थेचे पुरस्काराबद्दल ऋण व्यक्त करतो. .
कार्यक्रमासाठी प्रफुल्लचंद्र झपके साहेब, रावसाहेब केदार, ॲड.उदय घोंगडे, श्रीमती मंगलप्रभा कोरी, विश्वेश झपके साहेब, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, सां.ता.शि.प्र.मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी व सदस्य, लायन्स क्लब सांगोलाचे सदस्य, सर्व रोटरी सदस्य, सांगोला परिसरातील साहित्यप्रेमी नागरिक, पत्रकार, सेवानिवृत्त प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक यांच्यासह विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय अधिकारी, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाचा सूत्रसंवाद ग्रामीण साहित्यिक सुनील जवंजाळ व उन्मेष आटपाडीकर यांनी साधला तर आभार कामगार नेते अरुण गराडे यांनी मांडले.
Back to top button