मुंबई आणि परिसरात प्रत्येक सांगोलकरांना हक्काचे घर, सांगोला भवन आणि हक्काचे कार्यालय उपलब्ध करून देणार ; दिपकआबा साळुंखे पाटील

पिढ्यान पिढ्या दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईची वाट धरणाऱ्या सांगोलकरांना मुंबई आणि परिसरात सुमारे १०० एकरावर घरकुल योजना राबवून हक्काचे घर मिळवून देण्यासाठी तसेच आपल्या अडीअडचणी व व्यथा मांडण्यासाठी २४ तास तत्पर असणारे कार्यालय आणि सांगोला तालुक्यातील विद्यार्थी, तरुण तसेच अन्य नागरिकांसाठी नवी मुंबई परिसरात भव्य “सांगोला भवन” उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिले.
वाशी येथील सिडको एक्जीबिशन अँड कॉन्वेंशन हॉल येथे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला तालुक्यातील हजारो नागरिकांचा भव्य दिव्य आणि अभूतपूर्व असा स्नेह मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी सांगोला तालुक्यातील सुमारे ७ ते ८ हजाराहून अधिक नागरिक उपस्थित होते. आजवरच्या इतिहासात मुंबई परिसरात झालेला हा सर्वात भव्य दिव्य स्नेह मेळावा होता. दरम्यान या स्नेह मेळाव्यात मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या हजारो सांगोलकर कुटुंबीयांनी सहकुटुंब सामील होत दिपकआबा साळुंखे पाटील यांचेशी दिलखुलास संवाद साधला. या स्नेह मेळाव्यातील उपस्थित नागरिकांचा उत्साह एखाद्या उत्सवाप्रमाणे होता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादाने या स्नेह मेळाव्याची मुंबईसह संपूर्ण सांगोला तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, अलिबाग, पनवेल, पालघर तसेच मुंबई परिसरातील सर्व सांगोलकर बांधवांना संबोधित करताना दिपकआबा म्हणाले, मुंबईत सांगोलकर बांधवांनी केलेल्या भव्य दिव्य स्वागत आणि मी अक्षरशः कृतार्थ झालो आहे. आजवर केलेल्या निस्वार्थ आणि निरपेक्ष कामाची ही मी पोहोच पावती आहे असे मानतो. मुंबईतील बांधवांनी केलेल्या सत्कारामुळे यापुढील काळातही आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली. गेली ३० ते ३५ वर्ष राजकीय आणि सामाजिक आयुष्यात सक्रिय असताना माणुसकी हाच आपला धर्म आणि निस्वार्थ कर्तव्य हेच आपली जात या भावनेने काम करत आलो आहे. समोर येणारा व्यक्ती कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा किंवा कोणत्या धर्माचा याचा कधीच विचार न करता येणाऱ्या नागरिकांचे काम मार्गी लावणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेतून कसलीही अपेक्षा न ठेवता प्रत्येक व्यक्तीचे काम तडीस नेण्याचा प्रयत्न केला. या पुढील काळातही याच विचारावर आपण काम करू आणि मनात कोणता पूर्वग्रह न ठेवता निस्वार्थपणे शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहू ग्वाही ही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सबंध सांगोलकरांना दिली.
——————————
संपूर्ण सांगोला तालुक्यासह आता मुंबईस्थित सांगोलकरांनीही यंदाच्या निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करण्याचा निर्धार केला आहे. आमदार म्हणून निवड झाल्यानंतर दिपकआबा साळुंखे पाटील यांनी धनगरी वेशात विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घ्यावी अशी विनंती धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोटे यांनी केली. यावर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तत्काळ होकार दर्शवून वर्षानुवर्षी प्रलंबित असणाऱ्या धनगर समाजाच्या मागण्यावर आवाज उठवणार असा शब्द दिला.
——————————
राजकीय भूकंप मुंबईत पण हादरे सांगोल्यात..!
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आयोजित केलेल्या मुंबई येथील स्नेह मेळाव्यात रेकॉर्ड ब्रेक ७ ते ८ हजार सांगोलकर बांधवांनी उपस्थिती लावल्याने या स्नेह मेळाव्याची संपूर्ण सांगोला तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे. दिपकआबांच्या सांगोला तालुक्यात सुरू असलेल्या गावभेट दौरा, महिला मेळावा तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळत असतानाच मुंबई येथील स्नेह मेळावा सुपरहिट झाल्याने अनेक राजकीय पक्षांना चांगलेच टेन्शन आले आहे. त्यामुळे राजकीय भूकंप मुंबईत पण हादरे सांगोल्यात अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागल्या आहेत.