मविआ नेत्यांची सुरक्षा हटवली, नार्वेकरांची सिक्युरिटी मात्र टाईट
शिंदे-फडणवीसांचा इरादा काय?
मुंबई : ठाकरे सरकारचे निर्णय एकामागोमाग एक रद्द करण्याचा सपाटा लावलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी आणखी एक धक्का महाविकास आघाडीला दिला. संजय राऊत, भास्कर जाधव, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या अनेक प्रमुख विरोधी नेत्यांची सुरक्षा सरकारने काढून घेतली आहे, तर काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. मात्र रंजक बाब म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत उलट वाढ करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नार्वेकर यांना आधी ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा होती. आता त्यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा दिली आहे.
गेल्याच आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वाढदिवशी मिलिंद नार्वेकरांनी त्यांना जाहीर शुभेच्छा दिल्या आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर फटाके फुटले होते. ज्या शाहांची तुलना उद्धव ठाकरे अप्रत्यक्षपणे आदिलशाह-निजामशाहांशी करतात, तसंच ‘मातोश्री’वरील बंद खोलीतील चर्चांवरुन बोल लावताना दिसतात, त्या शाहांनाच ठाकरेंच्या ‘राईट हँड’ने ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं, मात्र त्यानंतर नार्वेकरांनी मातोश्री गाठल्याने डॅमेज कंट्रोल केल्याचंही बोललं गेलं.