शेकापने प्रचारात घेतली आघांडी,भ्रष्टाचाराच्या कारभाराला वैतागल्यामुळे तरुणांसह सामान्य नागरिकांची शेकापच्या सभांना तुफान गर्दी

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकासआघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांनी विधानसभा निवडणूक प्रचार सुरू केला आहे. पहिल्या दिवशी डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी बुधवार दि.6 रोजी खवासपुर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी, लोटेवाडी, अचकदाणी, ठोंबरेवाडी, लक्ष्मीनगर, बंडगरवाडी(चिकमहुद), कटफळ, इटकी, खिलारवाडी, गायगव्हाण, महिम या गावात जंगी कॉर्नरसभा घेतल्या. या सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
मागच्या 5 वर्षामध्ये सांगोला तालुक्यात मलिंदा गँग तयार झाली होती. त्या मलिंदा गॅगने तालुक्यामध्ये कामे फक्त दाखवायला ठेवली होती. गेल्या 5 वर्षात सर्वसामान्य जनतेची प्रशासकीय कार्यालयात कामे झाली नाहीत कारण प्रत्येक ठिकाणी पाकिटे मागितली गेली.भयभुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त सांगोला तालुका करण्यासाठी जनताच परिवर्तन करेल असे अशी अपेक्षा व्यक्त करत शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून मला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
सांगोला विधानसभा मतदारसंघात सत्ता नसतानाही डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख नेहमी मतदारांच्या संपर्कात राहिले आहेत. सर्वसामान्यांचा अडचणी सोडविल्या आहेत.त्याचप्रमाणे सर्वांच्या सर्व दु:खातही सामील झाले आहेत. त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब देशमुख हे दिवसांतून 14 ते 16 तास जनतेच्या सेवेत असतात, गेल्या 5 वर्षात सत्ता नसतांनाही सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांचे विविध माध्यमातून सामाजिक कार्य सुरूच होते. कै.डॉ.गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदार संघ हे कुटुंब मानून मतदार संघाला 55 वर्षे न्याय दिला. त्याच धर्तीवर आजही डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख हे जनसामान्यांसाठी कार्यरत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन मान्यवरांकडून करण्यात आले.
प्रामाणिक काम करणार्यांच्या पाठीशी सांगोला तालुक्यातील जनता उभा राहते हे स्व.आबासाहेबांच्या 55 वर्षाच्या वाटचालीवरुन सबंध महाराष्ट्राने पाहिले आहे.गेल्या काही वर्षामध्ये डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सुध्दा निस्वार्थपणे तालुक्याची सेवा करत वाटचाल केली आहे. त्यामुळे येणार्या निवडणुकीत आम्ही डॉ.बाबासाहेब देशमुख यांनाच मतदान करुन भरघोस मतांनी निवडून आणू असा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.