महाराष्ट्र

निवडणुकीतील ऐतिहासिक  विजयात सामील व्हा: आम. शहाजीबापू पाटील

सांगोला/ प्रतिनिधी– माझ्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात 5 हजार कोटीहून  अधिक निधी आणून तालुक्याच्या विकासाची कामे मार्गी लावली. महायुती सरकारने राज्यात अनेक महत्वकांक्षी योजना आखून प्रत्येक समाजाला व घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे . तालुक्याच्या उर्वरित विकासासाठी मतदारांनी जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देऊन ऐतिहासिक विजयात सामील व्हावे असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी जवळा येथे केले .
253 सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारानिमित्त जवळा तालुका सांगोला येथे 18 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये आमदार शहाजीबापू पाटील हे बोलत होते.
पुढे बोलताना आम. शहाजीबापू पाटील म्हणाले ,उद्याची निवडणूक ही तालुक्याच्या विकासाची व तरुणांच्या हाताला  रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून लढवत आहे . महायुती सरकारने शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे विज बिल माफ केले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत , महिलांना एसटी प्रवासामध्ये 50 टक्के सवलत, वर्षाला तीन गॅस सिलेंडर  मोफत, तसेच तालुक्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठा निधी आणला.
तसेच दिघंची ते  वाणीचिंचाळे रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासाठी 450 कोटी रुपये निधीची फाईल प्रस्तावित आहे.  मंगळवेढा शिरसी ते जत दोन तालुक्यांना ,जिल्ह्यांना जोडणारा रस्ता काँक्रिटीकरण यासाठी १७६ कोटी रुपयांचा निधी आणला असून याचे उद्घाटन ही झाले आहे. तालुक्यातील एकही गाव शेतीच्या पाण्यापासून वंचित ठेवले नाही.सांगोला तालुक्यात टेंभू म्हैसाळ,निरा उजवा कालवा, उजणीचे .जिहे- कट्टापुरचे पाणी मंजूर करून घेतले.सर्व कार्यालये एकत्र असावीत म्हणून शहरात तीन मजली प्रशासकीय इमारत, ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा दिला, रेस्ट हाऊसचे काम पूर्ण केले.भव्य ईदगाह मैदान  उभे केले. सांगोला येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी दिला. कोळा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दोन कोटी रुपये निधी दिला. होलार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ मंजूर केले.  तालुक्यात पाझर तलाव, रस्ते, समाज मंदिरे मंजूर करून अनेक कामे पूर्ण केली .पाच वर्षात सांगोला तालुक्यात केलेली विकास कामे पुस्तकाच्या रूपाने जनतेसमोर ठेवली आहेत. या निवडणुकीत मला पुढील पाच वर्षे सेवा करण्याची संधी देण्यासाठी विक्रमी मताधिकाने विजयी करावे असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी जवळे येथील सभेत केले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत व माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख म्हणाले, आमदार शहाजी बापू पाटील हे नुसते आमदार होणार नाहीत तर ते नामदार म्हणून तालुक्यामध्ये  येतील. तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी  शेतीच्या तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. चंद्रभागा नदीचे पाणी शिरभावी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून तालुक्याला मिळविले. बापूंनी ‌जलसंपदा विभागात  मंजूर केलेल्या पाण्याचे जीआर तपासून पहा. तालुक्यातील 95 हजार शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यासाठी कोट्यावधी रुपयाचा पिक जळीताचा निधी दिला. इतर कोणत्याही  तालुक्याला असा  निधी मिळाला नाही. शहाजीबापू पाटील हे विकास पुरुष असून ते पाणीदार आमदारही आहेत. उद्याची विधानसभा निवडणूक ही निर्णायक आहे. ही निवडणूक अटीतटीची असून राजकीय दृष्ट्या वैचारिक स्वरूपाची आहे. तालुक्याच्या परिपूर्ण विकासासाठी व तालुक्यातील तरुणांच्या भवितव्यासाठी बापूंना आमदार करणे गरजेचे आहे. केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे व विचाराचे सरकार असल्यास तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास करणे शक्य होते.  बारामती सारखा सांगोला तालुक्याचा विकास होणार असून त्याचे साक्षीदार होऊया असे विचार त्यांनी व्यक्त केले.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी शिवाजी अण्णा गायकवाड ,आप्पासाहेब देशमुख, राजश्रीताई नागणे पाटील, राणीताई माने, छायाताई मेटकरी, लतिका मोटे, प्रा. संजय देशमुख, ॲड. बंधू काशीद, नवनाथभाऊ पवार ,शशिकांतभाऊ देशमुख, डॉ. मानस कमलापुरकर, विजय बनसोडे ,ॲड. महादेव कांबळे, दीपक ऐवळे, दिलीप सावंत ,खंडू सातपुते, दामोदर साठे, सतीश काटे, अनिल नवत्रे, अण्णा गस्ते आदी मान्यवर व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button