राजकीयसांगोला तालुका

शहाजीबापूंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा

बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी साधणार संवाद, शहाजीबापूंचा मात्र टोला...

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे नऊ नोव्हेंबरला सांगोला दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते थेट शेतकऱ्यांच्या (Farmers) बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Mla Shahajibapu Patil) हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यावर मात्र, शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य यांच्या दौऱ्यानंतर सांगोल्यात शिवसेनेच्या 900 मतांची संख्या 1100 पर्यंत पोहोचेल असा टोला शहाजीबापूंनी लगावलाय.

संगेवाडी आणि मांजरी या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य ठाकरे जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. संगेवाडी आणि मांजरी परिसरात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या ठिकाणी जाऊन मी पाहणी केली असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले. जवळजवळ सगळे पंचनामे झाले आहेत. काही ठिकाणी थोड्या अडचणीमुळं पंचनामे राहिले आहेत आहेत. पण 100 टक्के पंचनामे पूर्ण करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संपर्क साधणं चांगलेच

ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे. तिथे राज्यातील नेते येतच असतात. आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्याचे तरुण नेते आहेत. त्यांनी ग्रामीण भागात अडीअडचणीच्या काळात शेतकऱ्यांशी संपर्क साधणं चांगलेच असल्याचे शहाजीबापू म्हणाले. संगेवाडी आणि मांजरी या गावात मी गेलो होतो. तिथेच जास्त नुकसान झालं आहे. त्यामुळं आदित्य ठाकरे देखील त्याच गावांची पाहणी करणार असल्याचे पाटील म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, शिंदे-पवार यांच्या भेटीमागे मोठं रहस्य दडलंय. यावर देखील शहाजीबापू पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पाटील म्हणाले की, शरद पवार आजारी आहेत, म्हणून मुख्यमंत्री त्यांना भेटले आहेत. आजारी असल्यावर एकमेकांना भेटतात असेही पाटील म्हणाले. 2024 चा वर्ल्ड कप पवारसाहेबांसाठी जिंकायचा असे मत राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरात काही नेत्यांनी व्यक्त केलं. यावर बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, वर्ल्ड कप क्रिकेटचा की फुलटबॉलचा असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. पुढची 15 वर्ष शिंदे आणि फडणवीस सरकार राहणार असल्याचे पाटील म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!