महाराष्ट्र
चोपडीत पाच दिवसापासून पाण्याचा ठणठणाट…!

नाझरा(वार्ताहर):- ऐन उन्हाळ्यात चोपडी परिसरातील अनेक वाड्यावस्थांवर आणि गाव भागात गेल्या पाच ते सात दिवसापासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे माणसांना पिण्यासाठी दररोज दहा ते पंधरा रुपये मोजावे लागत आहेत. जनावरांसाठी लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी जवळपासच्या इंधन विहिरीचा आधार शोधावा लागत आहे.
विविध प्रकारच्या तांत्रिक बिघाडाचे कारण देत चोपडी गाव भाग आणि चोपडी ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या विविध वाड्यावस्थांवरती गेली पाच ते सात दिवसापासून पाणी न मिळाल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत आहे यातच भर म्हणजे नळाला पाणी येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी गावात खाजगी मालकीचे पाच आरो प्लांट आहेत पिण्याच्या पाण्यासाठी या प्लांट चा वापर केला जातो, मात्र घरगुती खर्चासाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडत आहे. ज्या वस्त्यांवरती ग्रामपंचायतीच्या नळाद्वारेच पाणी मिळते अशा वस्त्यांवरच्या नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. माजी आमदार शहाजी बापू पाटील गाव भेटी दरम्यान आल्यानंतर काही ग्रामस्थांनी पाण्याबाबतची गंभीर समस्या मांडली.
गेली पाच ते सात दिवस नळाला पाणी न आल्यामुळे लोक त्रासून गेले आहेत. इतर वेळी एक दिवसाआड नळाला पाणी येत होते, त्याची पाणीपट्टी वर्षाला 1800 रुपये प्रमाणे आकारली जात आहे. ही पाणी पट्टी सुद्धा जास्त असल्याची चर्चा लोकांमधून होत आहे.पाणीपट्टी कमी करून वेळच्यावेळी पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.



