सांगोला: आषाढी वारी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचा सिद्धिविनायक कुटुंबात आणण्याचा योग सिद्धिविनायक कुटुंबाचे चेअरमन श्री आण्णासाहेब मदने गुरुजी यांच्या रूपाने काल घडून आला.
पंढरपूरला वर्षानुवर्षे येणाऱ्या वारकऱ्यांना आपण पाहतो पण वारीचा प्रवास किती आनंददायी व सुखद असतो याची प्रत्यक्ष अनुभूती उपस्थित सर्वांनाच नक्की मिळाली असेल. काल सायंकाळी सूर्य मावळतीला जात असताना, हिरव्यागार निसर्गरम सिद्धिविनायक कुटुंबामध्ये कोल्हापूर येथील दिंडीचा प्रवेश झाला. अंथरलेल्या हिरव्या चटईने व त्यावर पडलेल्या पांढऱ्या शुभ प्रकाशाने, घरावरील विद्युत रोषणाईने भरगच्च झाडीच्या मध्यावरती पार पडलेला हा सुखद क्षण पाऊल पडताक्षणी सगळ्यांना आनंद देऊन गेला. वारकरी यांनी घेतलेल्या विविध खेळातून मिळणारा आनंद त्यांच्याबरोबर सिद्धिविनायक कुटुंबातील सदस्यांनी सुद्धा मनमुराद लुटला. काही काळासाठी आपण स्वतःला विसरून गेलो.
अत्यंत सुंदर प्रवचनानंतर स्वादिष्ट रुचकर व सात्विक जेवणाचा आस्वाद सर्वांनीच घेतला. सिद्धिविनायक कुटुंबातील सदस्यांनी व पाल्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीने परिश्रमाचे योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला. याचबरोबर भक्तीपूर्ण भजनाचा सुमधुर कार्यक्रम श्री सुभाष भंडगे गुरुजी व त्यांच्या ग्रुप कडून संपन्न झाला. याच कार्यक्रमात वारकरी ग्रुपमधील युवकांनी सादर केलेली भक्तीगीत सर्वांच्याच मनाला स्पर्श करून गेली.
अतिशय भक्ती भावाच्या वातावरणामध्ये हा दिंडी सोहळा प्रथमच सिद्धिविनायक कुटुंबामध्ये पार पडला. यातून मिळालेला आनंद, उत्साह हा दीर्घकाळ आपल्या सर्वांच्याच मनामध्ये घर करून राहील असे बोलले जात होते.