पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज भरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
पोलीस भरतीत इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील अनेक उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे राज्य सरकारने अर्ज भरण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवली आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नुकतीच माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस भरतीसाठी आमच्याकडे आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज आले आहेत. मात्र काही ठिकाणाहून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत आम्ही १५ दिवसांनी वाढवून देत आहतो. उर्वरीत तक्रारी दूर करण्यासाठी हे जास्तीचे १५ दिवस देत आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उमेदवारांना अर्ज भरताना नॉन क्रिमिलीयरच्या संदर्भातही काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. मागील वर्षाचं नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र या वर्षी मिळतं. त्यामुळे मागील वर्षीचं हे प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे. पोलीस भरतीसंदर्भातील ज्या काही मागण्या आहेत, त्या आम्ही मान्य केल्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.