सांगोला तालुका

माघी यात्रेत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी- अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे

पंढरपूर, दि. 20:- माघ शुध्द एकादशी बुधवार दि. 01 फेब्रुवारी 2023 असून, या यात्रेचा कालावधी 26 जानेवारी ते 05 फेब्रुवारी असा आहे. या यात्रा कालावधीत श्री. विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वछता व सुरक्षेला प्राधान्य देवून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी समन्वय ठेवून सोपविलेल्या कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदीर समितेचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी यावेळी दिल्या.
माघ वारी पुर्व नियोजनाबाबत नवीन भक्त निवास पंढरपूर येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, अप्पर तहसिलदार समाधान घुटूकडे,गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, पोलीस निरिक्षक अरुण फुगे, मिलिंद पाटील, अरुण पवार, धनंजय जाधव, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे म्हणाले, यात्रा कालावधीत नगरपालिकेने शुध्द व पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, नदीपात्रातील वाळवंटाची व घाटाची स्वच्छता करावी, 65 एकर व व नदीपात्रात तात्पुरते शौचालयाचे उभारणीचे नियोजन करावे. 65 एकरमध्ये भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरेसा वीजपुरवठा आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत. आरोग्य विभागाने यात्रा कालावधीत पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा अशा सुचनाही अप्पर जिल्हाधिकारी श्री.ठोंबरे यांनी यावेळी दिल्या.
मंदीर समितीच्या वतीने नदीपात्रात 10 महिला चेजिंग रुम उभारण्यात येणार आहेत. पत्रा शेड, दर्शन रांग, दर्शन मंडप या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालये, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचेही अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदीर समितेचे कार्यकारी अधिकारी श्री. ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव म्हणाले, वारकरी सांप्रदायाच्या प्रथा परंपरेप्रमाणे चंद्रभागा वाळवंटात तात्पुरती वीज जोडणी देण्याबाबतचे नियोजन करावे. नदी पात्रात पुरेसा पाणीसाठर उपलब्ध राहील याबाबत पाटबंधारे विभागाने नियोजन करावे. नदीपात्रात प्रशिक्षित कर्मचाऱ्यासह यांत्रिक बोटी सज्ज ठेवाव्यात. आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावावाते. तसेच पार्किंगच्या ठिकाणी मोफत पार्किंगचे फलक लावावेत. यात्रा कालवाधीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधांची माहिती मिळावी तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही श्री.गुरव यांनी सांगितले.
यात्रा कालावधीत वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी तसेच भाविकांना सुरक्षेबाबत कोणतेही अडचण येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असल्याचे उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.यावेळी नगरपालिका प्रशासनाकडून वारी कालावधीत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा, स्वच्छता, तात्पुरते शौचालय, कचरा व्यवस्थापन आदी बाबबतची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.
यावेळी अन्न-औषध प्रशासन, परिवहन, महावितरण, आरोग्य आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!