कंत्राटी नोकर भरतीचं पाप महाविकास आघाडी सरकारने केलं;भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांचा हल्लाबोल

सांगोला ( प्रतिनिधी): जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची क्षमता असलेले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली आहे. सरकार पूर्णपणे सरकारी नोकरीमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना नियमाने सामावून घेणार आहे. कंत्राटी भरतीचा जीआर हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात काढण्यात आला होता. सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या शासकीय नोकर भरतीच्या प्रक्रियेत सगळ्यात मोठं पाप महाविकास आघाडी सरकारने केलं असल्याचा हल्लाबोल भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या निर्णयाच्या विरोधात जिल्हा भाजपच्या वतीने करमाळा शहरात तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत बोलत होते. यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात वाहनचालक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपीक या पदांसाठी कंत्राटी भरती झाली. शिक्षकांच्या कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा जानेवारी २०११ मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरती झाली.
महाविकास आघाडीच्या त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांनी कंत्राटी भरतीचा घाट घातला होता. मात्र, जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची क्षमता असलेले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूर्णपणे सरकारी रोजगार देण्यासाठी बांधील आहेत. सुशिक्षित बेरोजगारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. कंत्राटी पद्धतीने भरतीची ही पूर्ण प्रक्रिया महाविकस आघाडी सरकार असताना झाली होती. कंत्राटी भरतीबाबतचा पहिला निर्णय १३ मार्च २००३ ला झाला होता. सर्व शिक्षण योजना अतंर्गत शिक्षण विभागात कंत्राटी भरती झाली होती. काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला होता. काँग्रेस – शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत असताना शिक्षक भरतीचा कंत्राटी जीआर काढण्यात आला. संपूर्ण कंत्राटी भरती हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. कंत्राटी भरतीवर युवकांची दिशाभूल केल्याबद्दल उध्दव ठाकरे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात, शरद पवार यांच्या मार्गदर्शनात हा खटाटोप झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती रद्द करून हजारो तरुणांना दिलासा दिला असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, करमाळा तालुका सरचिटणीस सुहास घोलप, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, सोशल मीडिया प्रमुख नितीन कांबळे, प्रदेश युवा मोर्चा सचिव दीपक चव्हाण, कपिल मंडलिक, किरण बोकण, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कुंभार, महिला शहराध्यक्षा चंपावती कांबळे, जिल्हा सचिव शाम सिंधी, लक्ष्मण केकाण, नरेंद्र ठाकूर, माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे, अमरजित साळुंके, सुहास ओव्हळ, सचिन चव्हाण, रघुनाथ सावंत, ओंकार घोंगडे, विश्वजित जगदाळे, संदीप पवार, वनराज घोलप, बाळासाहेब तळेकर, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.