पाचेगांव खुर्द मध्ये जिजाऊंच्या रणरागिणी उतरल्या रणांगणात; सरपंच संगीता भोसले यांचं आमरण उपोषण

पाचेगांव(प्रशांत मिसाळ):-मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार गावागावातील सर्वसामान्य मराठा समाज शांततेत आमरण साखळी उपोषणाला बसलेला असून ग्रामीण भागात सगळीकडे शांततेत आंदोलने चालू असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु काही ठिकाणी जो उद्रेक झाला त्यामुळे मराठा नेत्यांची विश्वासहर्ता संपत चालली असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीमागे करोडोंचा समाज उभा राहिला आहे.
पाचेगांव खुर्द येथे शनिवार दि. 28 पासून आमरण साखळी उपोषण सुरू असून काल बुधवार दि 1 नोव्हेंबर रोजी पाचेगांव खुर्द येथील जिजाऊंच्या रणरागिणी आंदोलनाच्या रणांगणात उतरल्या असून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी उभा असल्याचे सांगितले. यावेळी पाचेगांव खुर्दच्या प्रथम नागरिक संगीत भोसले, सुजाता भोसले, पद्मिनी भोसले, सोनाली भोसले, राधिका मिसाळ, अनुजा भोसले, शीतल मिसाळ व ललिता मिसाळ यांनी आमरण साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
गेल्या पाच दिवसापासून गावात साखळी पद्धतीने आमरण उपोषण चालू असून काल पाचव्या दिवशी जयसिंगतात्या पाटील यांनी जल व अन्नत्याग करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला.
————————-
सत्ताधाऱ्यांच्या मुलांना साधा ताप आला तर यांना झोप लागत नाही पण एक शेतकऱ्याचा मुलगा गेली आठ दिवस अन्न पाण्याविना तिथं पडून आहे तरी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला याची जाणीव नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही मतदानाच्या स्वरूपात त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
— जयसिंगतात्या पाटील, पाचेगांव खुर्द