पोलीस भरती प्रक्रियेत यश मिळवण्यासाठी कठोर सराव सलोक वाचन व योग्य नियोजन करणे गरजेचे – श्री विठ्ठल कदम
पोलीस भरती प्रक्रियेत यश मिळवण्यासाठी कठोर सराव, सलग वाचन व योग्य नियोजन करणे गरजेचे आहे असे मत रुबाब खाकीचा करिअर अकॅडमीचे संचालक श्री. विठ्ठल कदम यांनी व्यक्त केले. स्पर्धा परीक्षा, करिअर समुपदेशन व मार्गदर्शन कक्ष, राष्ट्रीय शास्त्र सेना आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला महाविद्यालयात मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. विठ्ठल कदम यांनी पोलीस व लष्कर भरती विषयक मार्गदर्शन या विषयावर मार्गदर्शन करताना आपले मनोगत व्यक्त केले. सध्या शासनाने जाहीर केलेली पोलीस भरती महत्त्वाची असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यामध्ये भाग घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सदस्य श्री. सुरेश फुले, सचिव म.सि. झिरपे सर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अर्जुन मासाळ, स्पर्धा परीक्षा करिअर समुपदेशन व मार्गदर्शन कक्षाचे समन्वयक डॉ. जमीर तांबोळी व प्रशिक्षक श्री. विजय राऊत उपस्थित होते. श्री. विठ्ठल कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मैदानी सराव लेखी परीक्षा, अवांतर वाचन यासंबंधी मार्गदर्शन केले तर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी महाविद्यालयाचे मैदान, ग्रंथालय व व्यायाम शाळेचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले.
त्याचबरोबर संस्था सदस्य श्री. सुरेश फुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पर्धा परीक्षा केंद्रात जास्तीत जास्त सहभाग घेऊन प्रशासकीय नोकरी मिळवावी असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अर्जुन मासाळ यांनी केले. तर प्रमुख वक्ते श्री. विठ्ठल कदम यांचा परिचय डॉ. जमीर तांबोळी यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार मराठी विभागप्रमुख डॉ. बबन गायकवाड यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अनिस बागवान यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.