सांगोला(प्रतिनिधी): देशभरात सध्या विविध प्रकारची विषमता वाढत चालली आहे. यामुळे देशातील एकता आणि बंधुता याला धोका निर्माण होत चालला आहे.मानवी अधिकारांचे सातत्याने हनन होत चालले असून देशातील स्थिती गंभीर बनत चालली आहे याचा आता पुरोगामी विचारांच्या लोकांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय आणि संधी मिळावी यासाठी शाहू महाराज यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी केलेले कार्य हे लोकांच्या हिताचे आणि प्रेरणादायी होते. आज त्यांच्या विचारांचा संविधानात समावेश असून संविधानिक मुल्ये अंगीकारून त्याचा प्रचार प्रसार केल्यास समाजातील विषमता दूर होईल व हेच शाहू महाराजांना अभिवादन ठरेल असे मत असंघटीत कामगार नेते सुभाष लोमटे यांनी सांगोला येथे डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या मानवी साखळीत यांनी मांडले.
यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर, अॅड. सचिन देशमुख, बापूसाहेब ठोकळे, किशोर बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, सुरेशअप्पा माळी, शहाजी गडहिरे, अस्मिर तांबोळी, राजू मगर , नंदू मोरे ,प्रशांत कांबळे, प्रताप इंगोले, अॅड. प्रभा यादव, शर्मिला केदार, अशोक भोसले, अविल बोरकर, अॅड. महादेव कांबळे, गिरीधर इंगोले , गौसपाक मुलाणी, चंदन आटपाडकर, अमीर पटेल, शारदा गडदे, सारिका घाडगे, स्वाती वाघमारे, सचिन उबाळे, ललिता वाघमारे, सुरेश बाबर, प्रियांका शेंडगे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराज यांनी सर्वांना सन्मानाने जगण्याचा हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. बहुजन समाजासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडून समतेचा दीप प्रज्वलित करण्यात त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या विचारांचा आणि कृतीचा प्रचार-प्रसार व्हावा या साठी 26 जून 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता महात्मा फुले चौक सांगोला या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त मानवी साखळीस सुरुवात करण्यात आली. शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या मानवी साखळीची सांगता करण्यात आली.
समाजाला जोडणारे, विषमता दूर करणारे आणि परिवर्तनाचे प्रेरणास्थान असणारे शाहू महाराज यांचे सामाजिक सलोखा, सामाजिक न्याय, समता आणि समानतेचा संदेश देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज, स्व. आमदार गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला, ज्ञानदीप विद्यालय सांगोला, मांजरी हायस्कूल मांजरी, या संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षक शिक्षिका, तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी ललित बाबर, बाळासाहेब बनसोडे, किशोर बनसोडे, मा. जि. प. सदस्य सचिन देशमुख यांनी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी व विचारा विषयी तसेच संविधानासंदर्भात विचार व्यक्त करीत सर्वधर्मसमभावाचे धोरण अमलात आणावे. लोकशाही व संविधान याचे संवर्धन झाले पाहिजे ही भूमिका व्यक्त केली.
या कार्यक्रमात शहरातील तसेच तालुक्यातील शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका ,शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, सहभागी झाले होते. या मानवी साखळी दरम्यान शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच मानवी साखळीच्या सांगता कार्यक्रमा दरम्यान छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सांगोला शहर व परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.