नराळे ग्रामपंचायत सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाच्या सौ.वैशाली भोसले बिनविरोध
नराळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या सौ.वैशाली पांडुरंग भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.यावेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करून अभिवादन करण्यात आले.
सरपंच पदाच्या रीक्त झालेल्या जागेच्या निवडीसाठी सहा डिसेंबर रोजी सर्व ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीमध्ये सरपंच पदासाठी सौ वैशाली भोसले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा घेरडी मंडल अधिकारी सौ. प्रणाली भिटकर यांनी जाहीर केले.यावेळी ग्राम महसूल अधिकारी सौ. स्नेहल पाटील, ग्रामपंचायत अधिकारी बिभीषन सावंत व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
नूतन सरपंच ह्या पदवीधर असून त्यांनी काही हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी केली आहे.त्यांनी कोविड काळामध्ये अंध,अपंग, गोरगरीब लोकांना मदतीचा हात देऊन धान्य वाटप केले.बचत गटाच्या माध्यमातूनही त्यांनी उत्तम कार्य करून महिलांना सहकार्य केले आहे.पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 126 दगडी बांध केले आहेत. स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांनी नराळे येथे नेत्र शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णांचे नेत्र तपासून काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया ही करण्यात आल्या. विविध क्षेत्रातील त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने ग्रामपंचायत सन्मान योजना अंतर्गत त्यांचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आपल्या सरपंच पदाच्या कालावधीत आपण आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे नेतृत्वाखाली, गावातील जेष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे गावातील सर्व महिलांना युवकांना सोबत घेऊन ज्या महत्त्वाच्या समस्या व अडीअडचणी आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण करून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करणार आहे. रस्ते,पाणीपुरवठा,आरोग्य आणि शिक्षण याबाबतीत लक्ष घालून त्या संदर्भातील प्रश्न सोडवण्यास आपण प्राधान्य देणार आहोत.
नराळे ते वायफळ आणि नराळे ते येळवी हे रस्ते खडीकरण डांबरीकरण, मोबाईल साठी टॉवर उभा करणे,आरोग्य उपकेंद्र सेवा सुरू करणे इत्यादी कामे मार्गे लावण्यासाठी आपण आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यामार्फत पाठपुरावा करणार आहोत. गोरगरीब जनतेसाठी, महिलांसाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत, त्या सर्व योजनांचा लाभ घराघरापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही नूतन सरपंच सौ वैशाली भोसले यांनी सांगितले.