आदित्य ठाकरे यांच्या देशमुख कुटुंबियांच्या भेटीतून सांगोला तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणाच्या संदर्भात वेगळा संदेश

अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या ओल्या दुष्काळाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्याच्या भेटीवर आलेले उद्धव ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची नुकतीच पाहणी केली. यातून संवाद साधताना बाधित शेतकऱ्यांसह तरुणांना आदित्य ठाकरे यांनी आपलेसे केले. त्याचवेळी शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेताना त्यांनी देशमुख कुटुंबीयांसह शेकापशीही जवळीक साधताना आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात सूचक संदेश दिला आहे. या निमित्ताने सांगोल्यातील वातावरण ढवळून काढल्याचे दिसून आले.
संगेवाडी, मांजरी आदी गावांतील बाधित शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शेतकरी आणि तरुणांशी संवाद साधत असताना महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांनीही आदित्य यांना आवाज दिला आणि त्यांनी विद्यार्थ्यांचीही भेट घेऊन मुक्त संवाद साधला.
स्व.गणपतराव देशमुख यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. या वेळी त्यांनी स्व.गणपतराव देशमुख यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख आणि नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांचीही आवर्जून भेट घेतली त्याचप्रमाणे अल्प मतात पराभव झालेले शेकापचे 2019 सालीचे उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख यांच्याबद्दलही चौकशी केली. देशमुख कुटुंबियांच्या भेटीतून सांगोला तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणाच्या संदर्भात वेगळा संदेश देण्यात आल्याचे बोलले जाते.
गेल्या जून महिन्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी केली असता त्यांच्या सोबत गेलेल्या ४० आमदारांमध्ये आमदार ॲड. शहाजीबापू पाटील हे संपूर्ण मराठी विश्वात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. गुवाहाटीतील मुक्कामात ‘काय झाडी… काय डोंगार… काय हाटिल… समदं ओक्के’ या रांगड्या आणि माणदेशी ढंगाच्या भाषाशैलीतून केलेल्या संवादामुळे ॲड. शहाजीबापू यांना प्रसिद्धीचे वलय प्राप्त झाले होते. पट्टीचे वक्ते असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाषणांसाठी मागणी होऊ लागली. या मिळालेल्या संधीतून ॲड. शहाजीबापूंनीही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडण्याचे सत्र आरंभले होते.