महाराष्ट्र
सांगोला येथे अखिल भाविक वारकरी मंडळाचे पहिले राज्यस्तरीय वारकरी संमेलन संपन्न

सांगोला/ प्रतिनिधी: वारकरी संप्रदायाला खूप मोठी परंपरा आहे “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” भागवत संप्रदायाचा पाया मजबूत असल्याने आज विज्ञान युगात ही अध्यात्म यशस्वी ठरत आहे. वारकरी संप्रदायात अध्यात्म व संस्काराचा मोठा ठेवा आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा शंकरापासून तसेच नाथ संप्रदायापासून सुरू झाली आहे. संताकडे शब्दाची संपत्ती असते. महाराष्ट्र भूमीत चार संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदाय हा जीवनात आनंद देणारा आहे. गाथेचे वाचन सर्वात प्रथम पांडुरंगाने केले आहे. रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा यापुढेही अखंडपणे चालत राहणार आहे असे विचार श्री. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त ह. भ. प .निरंजननाथ योगीजी महाराज यांनी सांगोला येथे व्यक्त केले.
सांगोला येथे अखिल भाविक वारकरी मंडळाचे पहिले राज्यस्तरीय वारकरी संमेलन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. निरंजननाथ योगीजी महाराज हे होते. हा कार्यक्रम रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी सकाळी10 ते सायंकाळी 4 या वेळेत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन सांगोला येथे संपन्न झाला .
श्री. संत नामदेव महाराज यांचे वंशज ह.भ.प .माधव महाराज नामदास हे संमेलनाचे अध्यक्ष होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून गोपाळअण्णा वासकर महाराज हे उपस्थित होते. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज, ह. भ. प .नामदेव चवरे महाराज, आध्यात्मिक आघाडी शिवसेना प्रदेशाध्यक्ष ह. भ. प. अक्षय भोसले महाराज, प्रदेशाध्यक्ष ह. भ. प. जोतीराम चांगभले महाराज, जिल्हाध्यक्ष ह. भ. प.ज्ञानेश्वर भगरे महाराज, जिल्हा उपाध्यक्ष ह. भ. प. बिरा बंडगर महाराज, तसेच वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर, वारकरी जिल्हाध्यक्ष व महिला पदाधिकारी तसेच माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील उपस्थित होते.
सांगोला येथे वारकरी संप्रदायाचे राज्यस्तरीय संमेलन माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी आयोजित केले होते . यावेळी ह.भ .प सुधाकर इंगळे महाराज यांनी वारकरी संप्रदायाविषयी महत्वपूर्ण माहिती उपस्थित वारकऱ्यांना दिली. तसेच गाव तेथे भजनी मंडळ व तालुका तेथे वारकरी भवन तर जिल्ह्याच्या ठिकाणी राज्यस्तरीय वारकरी संमेलन घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले.
सांगोला येथे वारकरी संप्रदायाचे राज्यस्तरीय संमेलन माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी आयोजित केले होते . यावेळी ह.भ .प सुधाकर इंगळे महाराज यांनी वारकरी संप्रदायाविषयी महत्वपूर्ण माहिती उपस्थित वारकऱ्यांना दिली. तसेच गाव तेथे भजनी मंडळ व तालुका तेथे वारकरी भवन तर जिल्ह्याच्या ठिकाणी राज्यस्तरीय वारकरी संमेलन घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पार्वतीताई अवताडे यांनी वारकरी संमेलनात महिला भाविक वारकऱ्यांचा मोठा सहभाग असल्याबद्दल समाधान व्यक्त केले . सोलापूर जिल्ह्याच्या महिला वारकरी जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या पदाला न्याय देण्यासाठी व भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी, भोसले महाराज आदी वारकऱ्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,पूर्वीप्रमाणे आजचे कीर्तन दिशा दाखवणारे राहिले नसून त्यात मनोरंजनाचा भाग वाढला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारामुळे आपल्याला दिशा मिळाली असून, आपणही भक्तीमार्गाच्या दिशेने पुढे जायला हवे असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी वारकरी संमेलनास भेट देऊन या संमेलनासाठी शुभेच्छा देत जवळा येथे आध्यात्मिक नगरी उभा करण्याचा संकल्प जाहीर केला. जवळा येथे अडीच एकर जागेमध्ये लायब्ररी, स्मारक, वारकरी संप्रदाय प्रशिक्षण, निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. भविष्यात वारकरी संप्रदायासाठी महत्त्वपूर्ण व चांगले निर्णय घेतले जातील असे सांगत अध्यात्मामुळे हे जग यशस्वीपणे पुढे वाटचाल करीत असून विज्ञान युगातही अध्यात्माला विशेष असे महत्त्व असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी ह.भ. प सुधाकर महाराज इंगळे यांनी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, माजी नगरसेवक सतीश रावसाहेब सावंत यांची अखिल भारतीय वारकरी मंडळ पंढरपूर विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड केली व त्यांचा सन्मान केला. सांगोला येथे संपादक पत्रकार व माजी नगरसेवक सतीशभाऊ रावसाहेब सावंत यांनी हे राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित केले होते .या कार्यक्रमासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी व मंडळे उपस्थित होती. संमेलनासाठी राज्यभरातील अनेक जिल्ह्यातून वारकरी उपस्थित होते. अंबिकादेवी मंदिर चौक ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन पर्यंत ग्रंथदिंडी, पालखी काढण्यात आली . कार्यक्रमस्थळी सर्वप्रथम विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख वारकरी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक वारकरी बांधवांचे सहकार्य लाभले.
या संमेलनामध्ये घेण्यात आलेले ठराव ठराव :
1) कलाकार मानधन समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात भाविक वारकरी मंडळाचा एक प्रतिनिधी असावा.
2)’कलाकार मानधान निवड करताना 50 टक्के वारकरी असावेत.
3) माघ वारीला आषाढी वारीप्रमाणे प्रत्येक दिंडीला मानधान सुरु करावे.
4) प्रत्येक जिल्ह्यात एक वारकरी भवन उभे करावे.
5) शालेय शिक्षणामध्ये संत वाड:मय जास्त असावे.
6) भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी जिथं सप्ताह संयोजक असतील तिथं कीर्तनामध्ये इतर गीतांना बंदी असावी.
7) वारकरी शिक्षण घेतलेल्या मुलांना शैक्षणिक प्रवेशसाठी 5 टक्के मार्क गृहीत धरावेत.
8) महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रामध्ये मांस विक्री बंदी व दारू बंदी असावी. तीर्थक्षेत्राच्या 3 कि. मी. आत बंदी असावी असे विविध प्रकारचे ठराव संमत केले.