महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण 

सांगोला येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 50 लाखाच्या निधीची घोषणा

राज्य शासन दुष्काळग्रस्त भाग पाणीदार करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे राबवत आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध करणे व सिंचन क्षमता वाढवणे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सांगोला येथे आयोजित भीमसैनिकांनी उभारलेल्या निधीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या भव्य स्मारकाच्या अनावरण प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना व सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 3 हजार कोटीच्या निधीला मान्यता दिलेली आहे. ताकारी व म्हैसाळ या दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजना आहेत. सांगोला तालुक्याला देखील सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून त्या भागातील सिंचन क्षमता वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ह्या शासनाचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारावर चालत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिलेले आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत आहे. जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊल खुणा आहेत तो भाग शासनाच्या वतीने विकसित करण्यात येत असून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असेही त्यांनी सांगितले.
सांगोला तालुक्याचे विकासासाठी भरघोस निधी देण्यात आलेला असून पुढील काळातही सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नसल्याचे त्यांनी सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 50 लाखाचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच सांगोला येथील एमआयडीसी जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या या स्मारकातून आपण बाबासाहेबांचे विचार समता, स्वातंत्र्य व बंधुता हे सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून सांगोला तालुक्याचा ही विकास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री जयकुमार गोरे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई या मान्यवरांच्या हस्ते सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व त्यांचे भव्य स्मारक या अनुषंगाने प्रस्ताविक केले. या कार्यक्रमास हजारो भीमसैनिक उपस्थित होते.
*आरोग्य शिबिर*
       सांगोला येथे आयोजित आरोग्य शिबिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन ते पुढे म्हणाले की गेल्या अडीच वर्षात शासनाकडून मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेचे काम केले असून,मुख्यमंत्री सहायता निधीतून 450 कोटी रुपये देण्यात आले. राज्यात हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम या मुख्यमंत्री सहायता निधीतून केले. काही आजारावरील उपचाराचा खर्च सामान्य कुटुंबांना परवडणारे नसतात. सामान्य कुटुंबातील नागरिकांना मोठ्या आजारावरती तात्काळ उपचार मिळावेत यासाठी महात्मा फुले जन आरोग्य मर्यादा दीड लाख रुपयांपर्यंत होती त्याची शासनाने मर्यादा वाढवून पाच लाख रुपये पर्यंत केले आहे. तसेच त्यामधील अटी शर्ती देखील कमी करण्यात आल्या. राज्यातील साडेबारा कोटी जनतेला यातून आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
     सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

टायगर अभी जिंदा है, शहाजीबापूंना मोकळे सोडणार नाही

सांगोल्याच्या लोकांचे प्रेम बघून एकदम ओके वाटत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  शहाजीबापू पडले असले तरी लोकांचे तुमच्यावर प्रेम आहे. एखाद्या मॅचमध्ये हरले म्हणून विराटची बॅट थंड पडत नाही. टायगर अभी जिंदा है. बापूंना मोकळे सोडणार नाही. बापू मोकळा ढाकळा माणूस असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आम्ही उठाव केला तेव्हा सारेजण तणावात होते, पण बापू विनोद करुन वातावरण तणावमुक्त करायचे असे एकनाथ शिंदे म्हणाले. काय झाडी या डायलॉगमुळं आसामचे पर्यटन खूप वाढले आहे. आता तर बिल्डर देखील त्यांच्या जाहिरातीत बापूचा डायलॉग टाकताना दिसत आहेत. बापूंना हे माहीत नसावे नाहीतर रॉयल्टी मागितली असती ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button