शेतकरी त्रस्त आहेत , पिके वाया गेली परंतु कृषीमंत्री कुठे बांधावर दिसलेत का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

सांगोला(प्रतिनिधी):-सध्याचे सरकार हे राजकारणात अडकले आहे. शेतकरी त्रस्त आहे , पिके वाया गेली परंतु कृषीमंत्री मात्र कुठे बांधावर दिसलेत का? आदित्य ठाकरे यांनी असा सवाल उपस्थित केला. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत परंतू याकडे सरकारचे लक्ष नाही. राजकारण करण्यासाठी सरकारकडे वेळ आहे परंतू शेतकर्यांसाठी वेळ नाही. अशा कठीण प्रसंगी शिवसेना व आम्ही सर्व शिवसैनिक शेतकरी बांधवासोबत असल्याचे माजी पर्यटन मंत्री व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
संगेवाडी ता. सांगोला येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन माजी पर्याटन मंत्री आ.आदित्य ठाकरे यांनी आज बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी मांजरी येथे दुपारच्या सुमारास उन्हात शेतकर्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.यावेळी त्यांचेसोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, शिवसेना नेते प्रा.लक्ष्मण हाके, युवा सेना विस्तारक उत्तम ऐवळे, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे,सुर्यकांत घाडगे, कमरुद्दीन खतीब यांच्यासह शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 32 वर्षाचा मी मुलगा असून शेतीतील मला काही कळत नाही परंतु शेतकर्यांच्या डोळ्यातले अश्रू मला कळतात असा टोला विरोधकांना लगाविला. सध्याचे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? सध्याचे सरकार हे शेतकर्यांचे ऐकत नाही मग सरकार काय कामाचे असा प्रश्न उपस्थित करुन सरकारला धारेवर धरत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
यावेळी सरसकट पंचनामे व्हावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली. यावेळी सांगोला तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.



