शिर्डी अधिवेशन अर्ध्यात सोडून अजित पवार नेमकं कुठे गेले होते? त्यांनीच स्वत: केला खुलासा, म्हणाले “माझ्याशिवाय यांचं…”
मला काही खासगी आयुष्य आहे की नाही, अजित पवार संतापले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिर्डी येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय मंथन शिबिराच्या समारोपाच्या संपूर्ण दिवसभर विरोधी पक्षनेते अजित पवार अनुपस्थित राहिल्याने नाराजीच्या चर्चाना उधाण आलं होतं. पहिल्या दिवशी रात्रीपासूनच ते शिबीरस्थळी दिसले नसल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान नाराजीच्या या चर्चांवर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. पुण्यातील मावळ येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी या चर्चांवरील नाराजी जाहीर केली.
गेल्या पाच-सहा वर्षात मला विदेशात जाण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. माझा एक पूर्वनियोजित कार्यक्रम ठरला होता. त्यासाठी ४ तारखेला रात्री उशिरा दीड वाजता विमान होतं आणि गुरुवारी रात्री उशिरा परतणार होतो. पण अजित पवार नाराज आहेत, कुठेतरी गेलेत अशा चर्चा उठवण्यात आल्या. माझ्याशिवाय यांचं काय नडतं मला कळत नाही. दादाला काय खासगी आयुष्य आहे की नाही,” असा संताप अजित पवारांनी व्यक्त केला.
कारण नसताना बदनामी, गैरसमज निर्माण करण्यात आले. सहा महिन्यापूर्वी मी तिकीट काढलं होतं आणि त्यासाठीच गेलो होतो,” असं अजित पवारांनी स्पष्ट केले.
दरम्यान याआधी प्रसारमाध्यमांसमोरही त्यांनी नाराजी जाहीर केली. नाराजीच्या चर्चांच्या बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांवर त्यांनी खापर फोडलं. तुम्ही मध्यंतरी आजारी असल्याच्या चर्चा होत्या, असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. “मध्यंतरी मला खोकल्याचा त्रास होता. नंतर काही दिवस मी दौऱ्यावर होतो. रात्री उशीरा आलो. इथं काहीही बातम्या देतात, काहीही फालतू बातम्या देतात,” असं ते म्हणाले.