सांगोला तालुका

चंद्रभागा नदीची उपनदी झालेल्या कासाळगंगा प्रकल्पाने घडवली क्रांती

भाकरीसाठी स्थलांतरीत होणाऱ्या कटफळमध्ये रोजगारनिर्मिती

महूद : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीसह वसईला मातीकामासाठी कटफळ (ता. सांगोला) गावचे ग्रामस्थ स्थलांतरण करायचे. शेतीसाठी पाणी नसल्याने अशा हाल-अपेष्टा गावाने पंचवीस वर्षांहून अधिक काळ सोसल्या. गेल्या चार वर्षांपूर्वी कटफळ ग्रामस्थांनी पाणी कमवाण्यासाठी लोकसहभागातून कासाळगंगा ओढ्याचे पुनर्जीवन करत पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची उपनदी बनवण्यात पुढाकार घेतला. आता हेच गाव रोजगारनिर्मिती करत आहे. कासाळगंगामुळे पाणी उपलब्ध झाल्याने घरटी जर्सी गाईची दावण झाली असून दिवसाला पाच ते सहा हजार लिटर दुग्धोत्पादन होत आहे. एवढेच नव्हे, तर सिमला मिरचीने शिवार फुलला आहे.
कटफळकरांना पिण्यासाठी पाणी विकत आणावे लागायचे. आषाढात इथल्या कष्टकऱ्यांच्या हातात वसईच्या कामासाठी ‘ॲडव्हान्स’ मिळायचा. मग बहुतांश ग्रामस्थ पाऊस पडेपर्यंत स्थलांतरीत झालेले असायचे. या भागाला वरदान ठरलेला राजेवाडी हा ब्रिटीशकालीन तलाव २०१९ मध्ये दहा वर्षानंतर भरला होता. तो आता भरला आहे. तलावातून भूयारी कालव्याद्वारे पाणी कटफळपर्यंत आणले गेले. तलावातून पाणी चांगले मिळत होते, तोपर्यंत इथे भुईमूगाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतले जायचे. त्यावेळी सुगीचे दिवस असायचे. तलावात गाळ साठल्याने पाण्याचा संचय कमी होत असून १६ हजार १३० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या तलावाच्या पाण्यातून आता माण (जि. सातारा), आटपाडी (जि. सांगली) आणि सांगोला तालुक्यातील ४ हजार ४९ हेक्टरसाठी सिंचन होत आहे. राजेवाडी तलावाची साथ मिळत नसल्याने कटफळचे माळरान झाले होते. कासाळगंगा प्रकल्पामुळे कटफळची वाटचाल पुन्हा आर्थिक संपन्नतेच्या दिशेने सुरु झाली आहे.
कासाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्जीवनाच्या काळात उपलब्ध झालेला गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नेऊन टाकत जमीन कसदार बनवली. आता पाणी उपलब्ध झाल्याने दीड हजारांहून अधिक एकरावर शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे. ऊसाची लागवड अजून सुरु आहे. तसेच हिरवी मिरची, टोमॅटो, झेंडुची फुले, खरबूज, टरबूज असे उत्पादन शेतकरी घेऊ लागले आहेत. घरटी जर्सी गाई असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या चाऱ्यासाठी मक्याची लागवड केली आहे. छोट्या शेतकऱ्याला किमान वीस पोती, तर अधिकची दोनशे पोती इतके उत्पादन इथले शेतकरी मक्याचे घेत आहेत. मक्याचे क्षेत्र दीड हजार एकराहून अधिक आहे. याशिवाय दुग्धोत्पादन वाढल्याने मधल्या काळात दूध डेअरींची संख्या पाच पर्यंत पोचली होती. कोरोनामध्ये एक डेअरी बंद झाली. मात्र उरलेल्या चारही डेअरी सुरु आहेत. दुधाला चाळीस रुपयांपर्यंत लिटरला भाव मिळत आहे. सिमला मिरचीची लागवड मेमध्ये सुरु होते. दोन महिन्याने सिमला मिरचीची तोड सुरु होते. तीन महिने सिमला मिरची खरेदी करण्यासाठी कोलकोत्ताचे व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. एकरामध्ये चार ते पाच तोडीमध्ये सिमला मिरचीपासून आठ ते दहा लाखांचे उत्पन्न शेतकरी घेत आहेत. दिवसाला पन्नास ते साठ लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना सिमली मिरचीपासून मिळते.

‘‘माळरानावर मी एक एकरावर सिमला मिरची लावली आहे. मल्चिंग केले. ठिबकद्वारे पाणी देतो. लागवडीपासून उत्पादनापर्यंत एकरासाठी मी तीन लाख रुपयांचा खर्च केला आहे. पहिल्या तोडणीत मला दोन लाख रुपये मिळाले. आता दुसरी काढणी सुरु आहे. श्रमदानातून शाश्‍वत पाण्याकडे गावाने केलेल्या वाटचालीमुळे शेतकरी राजा समाधानाच्या दिशेने जाऊ लागला आहे, हे पाहताना समाधान मिळते.‘‘
– बाळासाहेब बलभीम खरात (शेतकरी, कटफळ)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!