सांगोला तालुक्यात जयमालाताई गायकवाड यांच्या गावभेट दौऱ्याचा झंझावात सुरूच…!
पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत महिलांनी चूल आणि मूल इतक्यातच मर्यादित न राहता आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून राजकारणाबरोबरच उद्योग व्यवसायातही समाजातील आपले अस्तित्व सिद्ध करावे महिला सबलीकरणासाठी आपण तालुक्यातील महिलांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा राहू असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी केले. गुरुवार दि १९ रोजी आयोजित गाव भेटी दौऱ्यात त्या बोलत होत्या.
गुरुवार दिनांक १९ रोजी त्यांनी सांगोला तालुक्यातील कमलापूर, नाझरा, वझरे, चिनके, य. मंगेवाडी, अजनाळे, वासूद, बामणी व संगेवाडी या गावांना भेट देऊन गावातील महिलांशी संवाद साधला यावेळी पारे गावचे माजी सरपंच संतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.राज मिसाळ, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका उपाध्यक्ष जयश्री पाटील, महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या मनीषा मिसाळ, सांगोला तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संभाजी हरिहर उपस्थित होते.
पुढे बोलताना जयमालाताई गायकवाड म्हणाल्या, देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार व संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या विशेष प्रयत्नातून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आणि सर्वत्र पुरुषांबरोबर समान आरक्षण मिळाले आहे परंतु तरीही अजून महिलांच्या सबलीकरणाची लढाई संपलेली नाही जोपर्यंत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ग्रामीण भागातील महिला यशस्वी उद्योजिका होऊन स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाहीत तोपर्यंत महिलांच्या हक्काची ही लढाई सुरूच राहील महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आपल्याकडून जे सहकार्य लागेल ते सर्वोत्तरी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आपले नेते मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील व सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून आपण पार पाडू असेही यावेळी जयमालाताई गायकवाड यांनी स्पष्ट केले.
महिला सबलीकरणाची लढाई शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील
सांगोला तालुक्यातील शेवटची महिला जोपर्यंत राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत त्यांच्या हक्काची लढाई सुरूच राहील. महिला सबलीकरणासाठी आपण जिल्हा परिषद सदस्य सभापती आणि अध्यक्षा म्हणून आपल्या परीने जास्तीत जास्त निधी महिलांना देण्यास प्राधान्य दिले यापुढील काळातही शेवटच्या श्वासापर्यंत महिला सबलीकरणाची लढाई सुरूच राहील
; जयमलाताई गायकवाड, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष