सांगोला तालुका

रब्बी हंगाम २०२३ पीक स्पर्धेचे आयोजन- कृषी अधिकारी शिवाजी शिंदे

31 डिसेंबर अखेर अर्ज करण्याचे आवाहन

 

 

सांगोला– कृषी विभागांमार्फत रब्बी हंगाम – 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासांठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पीकस्पर्धा राबविण्यात येणार असून पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 असल्याचे कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अश्या प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पीकस्पर्धेचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवण्यात येतील.

वंचित/दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धांमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून रब्बी हंगाम २०२३ पासून पिकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे पात्रता निकष – स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नांवे जमीन असंणे व ती जमीन तो स्वतः कसत असंणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल . पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

स्पर्धेतअर्ज करण्यासाठी आवशयक कागदपत्रे: – विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकितप्रत,

स्पर्धेसाठी प्रवेश शुक्ल पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु. 300 व आदीवासी गटासाठी रक्कम रुपये 150 असे असणार आहे. बक्षिस स्वरुप तालुका स्तरावर – प्रथम-रु. 5000/-, द्वितीय -रु. 3000/-, तृतीय -रु. 2000/- तर जिल्हास्तरावर – प्रथम-रु. 10000/-, द्वितीय -रु. 7000/-, तृतीय -रु. 5000/-व राज्यस्तरावर – प्रथम-रु. 50000/-, द्वितीय -रु. 40000/-, तृतीय -रु. 30000/- असे असणार आहे.

पीकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी, असे पत्रकात नमूद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!