सांगोला तालुका
न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
न्यू इंग्लिश स्कूल सांगोला मध्ये ३ जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ‘बालिका दिन’ म्हणुन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यू इंग्लिश स्कूल चे पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर, प्रमुख पाहुण्या सौ. स्मिता इंगोले मॅडम, न्यू इंग्लिश स्कूल चे उपमुख्याध्यापक प्रा.नामदेव कोळेकर,न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिक चे मुख्याध्यापक दिनेश शिंदे सर पर्यवेक्षक दशरथ जाधव सर जेष्ठ शिक्षक दत्तात्रय पांचाळ सर उपस्थित होते. कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना सौ. कोमल भंडारे मॅडम यांनी मांडली तर अध्यक्षीय सूचनेला अनुमोदन सौ. निलोफर मुजावर मॅडम यांनी दिले. यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिमा पूजना नंतर सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ. गीता गुळमिरे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले व बालिका दिनाचा आढावा घेवुन सावित्रीबाईंचे स्त्री शिक्षणातील महत्व आधोरेखित केले. त्यानंतर इयत्ता पाचवी व नववी च्या विद्यार्थ्यांनी कविता सादर केली. कविता सादरीकरणानंतर प्रशालेत बालिका दिनानिमित्त पार पडलेल्या हस्ताक्षर स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडले. इयत्ता पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक श्रावणी मिलिंद पाटणे द्वितीय क्रमांक गौरी संतोष कोडग तृतीय क्रमांक नितांत अशोक कांबळे उत्तेजनार्थ मयुरी ईश्वर तरकसबंद व अथर्व सुहास गोडसे तसेच इयत्ता आठवी ते दहावी गटात प्रथम स्नेहल सुभाष देवकते द्वितीय श्रेयश तानाजी गाडेकर तृतीय आरती हरिदास शिनगारे व सृष्टी सचिन घाडगे उत्तेजनार्थ आदित्य विकास शिंदे व अपेक्षा अविनाश तोडकरी या सर्वांचा सन्मान करण्यात आला. सोलापुर जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परिक्षेतुन प्रज्ञा परिक्षेस पात्र झालेल्या इयत्ता पाचवी मधील निसर्ग चैतन्य फुले व कार्तिक अमर गोसावी तसेच इयत्ता आठवी मधील संचिता संजय देशमुख,समृद्धी विष्णू माळी व विदाद जमीर शेख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर या विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे निलोफर मुजावर मॅडम अविनाश सरगर सर व राणी आदलिंगे मॅडम यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या स्मिता इंगोले मॅडम यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की, शिक्षणाद्वारे स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, शिक्षणाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे पवित्र कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत झाले, हे आपले भाग्य आहे. सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तत्कालीन स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचा विचार करून स्त्रियांना शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून समाजकार्य केले. या कार्यात तत्कालीन समाजकंटकांनी त्यांना अतोनात त्रास दिला. हेटाळणी, दुःख त्यांच्या वाट्याला आले. महात्मा फुले यांच्या पश्चात देखील त्यांनी त्यांच्या कार्याचा वसा पुढे चालू ठेवला. आजच्या समाजाने, स्त्रियांनी, विद्यार्थीनींनी या त्यागाची, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार व कार्याची जाणीव ठेवली पाहिजे. त्यांच्या आदर्श विचारांचा नक्कीच अंगीकार केला पाहिजे. माणसे उगीचच मोठी होत नसतात तर त्यांच्या कर्तृत्वामुळे समाज त्यांना शीर्ष स्थान देत असतो असे त्यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात न्यू इंग्लिश स्कूल चे पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी 1848 रोजी महिलांच्या साठी पहिली शाळा काढली. ती शाळा चालवत असताना त्यांना अनेक यातनांना सामोरे जावं लागलं. अनंत यातना सहन करूनही महिलांची शाळा चालूच ठेवली. मनुस्मृतीनुसार मनुस्मृतीचा कायदा आणि समाज व्यवस्था अस्तित्वात होती. त्यामुळे भारतीय महिलांना शिक्षण नाकारले होते. महिलांना अनेक रीती रिवाज, रूढी परंपरा यात अडकवले होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी जाणले की, महिलांना शिक्षण दिल्याशिवाय प्रगती होणार नाही आणि मुलीं साठी पहिली शाळा काढली. महिलांना सन्मानाने कसे जगता येईल यासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी आयुष्यभर प्रयत्न केले. भारतीय समाजाची परिस्थिती सुधारावी यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी या तत्वानुसार सत्यशोधक समाजाचा एकेश्वर वादावर विश्वास होता. परमेश्वर एकच आहे तो निर्गुण निराकार आहे. त्याची पूजा करण्यासाठी कोणतेही कर्मकांड करण्याची गरज नाही. सात्विक भावनेने त्याच्या स्मरण केले तर तो तुम्हाला प्राप्त होतो. बहुजन समाजातील वाईट चालीरीती बंद व्हाव्यात यासाठी सत्यशोधक समाजाने काम केले असे सांगितले.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता शिंदे मॅडम यांनी केले तर शेवटी आभार अनिल पवार सर यांनी मानले.
One attachment • Scanned by Gmail